संभाजीनगरात अजित पवार गटाच्या कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न:प्रचाराला गालबोट; राष्ट्रवादीच्या प्रचार यंत्रणेवर अज्ञातांचा हल्ला

छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आधीच तापलेलं असताना, राष्ट्रवादी काँग्रेस या अजित पवार यांच्या पक्षाला धक्का देणारी गंभीर घटना समोर आली आहे. शहरातील वार्ड क्रमांक 16 मधील कैलास नगर परिसरात असलेल्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात अज्ञात व्यक्तीने आग लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी 7 जानेवारी रोजी पहाटे सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, निवडणूक प्रचाराच्या काळात घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कैलास नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर उभारलेल्या मंडपाला अज्ञात व्यक्तीने आग लावण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी परिसरात काही कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखत आग वाढण्यापूर्वीच ती आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जर आग भडकली असती, तर कार्यालयातील साहित्य, प्रचार सामग्री तसेच आजूबाजूच्या वस्त्यांनाही धोका निर्माण झाला असता, अशी चर्चा स्थानिकांमध्ये होत आहे. या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी, प्रचार कार्यालयाला लक्ष्य करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर सोनवणे यांचा प्रचार सध्या जोरात सुरू असून, त्यांच्या प्रचार यंत्रणेवर थेट हल्ला करण्याचा हा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक जशी जवळ येत आहे, तसतसे विरोधकांकडून दबाव वाढत असल्याचा आरोपही काही कार्यकर्त्यांनी केला आहे. घटनेनंतर तातडीने जिंसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, संपूर्ण परिसरातील तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज उपलब्ध झाले असून, त्याच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आग लावण्यामागचा नेमका उद्देश काय होता, ही घटना राजकीय वैरातून घडली की इतर कोणता हेतू होता, याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणामुळे निवडणूक काळातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रचार कार्यालये, मंडप, बॅनर आणि प्रचार साहित्य यावर यापूर्वीही विविध ठिकाणी हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, थेट आग लावण्याचा प्रयत्न झाल्याने ही घटना अधिक गंभीर मानली जात आहे. स्थानिक नागरिकांनीही अशा प्रकारांबाबत चिंता व्यक्त करत, निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. हा लोकशाहीवरच हल्ला दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. लोकशाही मार्गाने लढवायच्या निवडणुकीत हिंसक प्रकारांना कोणताही स्थान नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रचार कार्यालय जाळण्याचा किंवा कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न हा लोकशाहीवरच हल्ला असल्याचं मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे. दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहावं पोलिस तपास सुरू असताना, संपूर्ण शहरात या घटनेची चर्चा रंगली आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अशा घटना घडल्यास वातावरण अधिकच तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात प्रचारादरम्यान सर्वच पक्षांनी संयम राखावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि दोषी कोण ठरतात, याकडे आता संपूर्ण छत्रपती संभाजीनगरचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!