सत्ताधारी महायुतीच्या धाक, दडपशाहीमुळे जनता दहशतीत असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला. महापालिकेच्या निवडणुकीत पातळी सोडून एकमेकांवर टीका केली जात आहे. अजित पवार व पुण्यातील एका स्थानिक आमदाराचे विधान ऐकले तर हे लोक एकमेकांच्या अंगावर तलवारी घेऊन धावून जायचेच राहिलेत, असे ते म्हणालेत. राज्यात येत्या 15 तारखेला मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमधीलच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या 3 घटकपक्षांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना या मुद्यावरून महायुतीवर चांगलाच निशाणा साधला. ते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत सध्या पातळी सोडून टीका केली जात आहे. काल अजित पवार व पुण्यातील एका स्थानिक आमदाराचे विधान ऐकले, तर हे लोक एकमेकांच्या अंगावर तलवारी घेऊन धावून जायचेच राहिलेत. कुणी दरोडा म्हटले, तर कुणी औकात काढली. सत्तेत असणारे हे दोन्ही पक्ष ज्या पद्धतीने एकमेकांसोबत भांडत आहेत, त्यावरून सत्ता हीच त्यांच्यासाठी सर्वोच्च असल्याचे स्पष्ट् होते. त्यांच्यात विचार कुठेच दिसत नाही. या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला त्यांची विचित्र भूमिका बघायला मिळत आहे. निवडणुकीत पोलिस व गुंडांचा वापर केला जात आहे. हे पाहून जनता घाबरली आहे. भाजप हा स्वच्छ पक्ष आहे का? असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित होत आहे. जनतेच्या मनात राग व संताप विजय वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात सध्या राग व संताप दिसत आहे. परंतु जनता हतबल आहे असेच म्हणावे लागेल. कारण हे सरकार यंत्रणा, निवडणूक आयोग, पोलिस व गुंडांचा वापर करून चालवले जात आहे. तिन्ही पक्षांनी गुंडांचा आश्रय घेतल्यामुळे जनता दहशतीखाली जगत आहे. अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही अशी अवस्था या या महाराष्ट्रात दिसली असती. मुळात आज निवडणुकीला काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. अंबरनाथमध्ये आमचे नगरसेवक पळवले गेले. यामुळे भाजप हा स्वच्छ पक्ष आहे का? यांचा चेहरा स्वच्छ राहिला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काल जयंत पाटलांनी एक किस्सा सांगितला. ‘ये आये थे तवायफ का कोठा बंद करने के लिए, पर सिक्कों की खणक देख खुद ही मुजरा कर बैठे; असे ते म्हणाले. सध्या हेच भाजपमध्ये हेच सुरू आहे. सगळ्या सत्ताधाऱ्यांचे स्वच्छता व स्मार्ट सिटीचे बोर्ड लागलेले असतात, पण त्याखाली कुत्री बसलेली दिसतात. ही यांची स्वच्छता. भाजपचा तेरे राज में युवा हो गया बरबाद..
ते पुढे म्हणाले, पैसा आला, पण तो गेला कुठे? चंद्रपूरमध्ये पैसा आला. अमृत योजना आली. भूमिगत गटार योजना आली. पण गेली कुठे? चंद्रपुरात बंद गटार योजना आली. फक्त लाईन टाकली, रोड खोदले. पण त्याचे कनेक्शन एकाही घराला दिले नाही. पूर्ण शहर टक्केवारीसाठी उद्ध्वस्त करून टाकले. शहर भकास करण्याचा प्रकार सुरू झाले आहे. आज शहराला पाणी मिळत नाही. मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे. शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पूर्ण शहर ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहे. चंद्रपूर शहराची ही गती व स्थिती पाहिल्यानंतर भाजपचा तेरे राज में युवा हो गया बरबाद, तू कितना भी चिल्ला फिर से नही करेगा तुझे याद, असे म्हणण्याची वेळ आली आहे. जनता या सर्व गोष्टींचा नक्कीच विचार करेल. बिनविरोध निवडणुकीसाठी उमेदवारांना धमकावण्यात आले विजय वडेट्टीवार यांनी यावेळी महापालिका निवडणुकीत पैशांचा प्रचंड वापर होत असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, महापालिका निवडणुकीत पैशांचा प्रचंड वापर केला जात आहे. एकेका वॉर्डासाठी 1 कोटीचे बजेट ठेवण्यात आले आहे. नागपुरात 5-5 कोटी, मुंबईत 10-10 कोटींचे बजेट आहे. हा पैसा आला कुठून? पैसा येतो कुठून? आमदार व पक्ष फोडण्यासाठी पैसे आले कुठून? निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उमेदवारांना पैसे देण्यात आले. त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तर त्यांना धमकावण्यात आला. हे सर्व पाहिल्यानंतर खरेच आपण लोकशाहीत जगतो का हा खरा प्रश्न पडतो. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास असेल, हा देश संविधानानुसार चालावा असे वाटत असेल ते या निवडणुकीत नक्कीच विचार करतील आणि निवडणुकीचे निकाल आपल्याला बदलेले दिसतील, असे वडेट्टीवार म्हणाले.
