भाजपवर लाईन, काँग्रेससोबत लग्न!:यांना स्वतःचे खासदार सांभाळता येत नाहीत’; 6 खासदारांच्या बंडावर प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. “हे कोणतेही ऑपरेशन टायगर नाही, तर स्वतःचे खासदार सांभाळण्यात आलेले अपयश आहे,” असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला. मुंबईत माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचवेळी भाजप आणि आरएसएसवरही त्यांनी जोरदार टीका केली. ‘स्वतःच्या पक्षाशी निष्ठा नाही, मग कार्यकर्ते का राहतील?’ प्रकाश आंबेडकर म्हणाले, “याला ऑपरेशन टायगर म्हणता येणार नाही. त्यांना स्वतःचे खासदार सांभाळता येत नाहीत. त्यांचेच लोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांना भेटतात, पुन्हा परत येण्याबाबत चर्चा करतात आणि कार्यकर्त्यांनी मात्र निष्ठावान राहावे अशी अपेक्षा ठेवतात.” ते पुढे म्हणाले, “तुम्ही स्वतः पक्षाशी प्रामाणिक नसाल, तर कार्यकर्ते कुठून निष्ठावान राहतील? स्पष्टपणे सांगा की तुम्हाला भाजपसोबत जायचे आहे. मग कार्यकर्त्यांमध्ये तरी संभ्रम राहणार नाही.” ‘भाजपवर लाइन, काँग्रेससोबतही लग्न’ ठाकरे गटाच्या राजकीय धोरणावर टीका करताना आंबेडकर म्हणाले, “एकीकडे भाजपकडे लाइन मारायची आणि दुसरीकडे काँग्रेससोबत लग्न करायचे. हा दुटप्पीपणा कार्यकर्त्यांना दिसत आहे. त्यामुळे खासदार निघून गेले यात काही नवीन नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या राजकारणातही नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. ‘कार्यकर्ते मूर्ख नाहीत’ एएनआयशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक महत्त्वाचे विधान केले. “ते अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात जगत आहेत. कार्यकर्ते मूर्ख नाहीत. त्यांना हा दुहेरी खेळ दिसत आहे.” विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून प्रकाश आंबेडकर सातत्याने महाविकास आघाडीतील काही पक्षांच्या राजकीय भूमिकांवर टीका करत आहेत. ‘बी टीम’च्या आरोपांवरही पलटवार प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी विरोधकांवरही निशाणा साधला. “वर्षानुवर्षे वंचित बहुजन आघाडीला भाजपची ‘बी टीम’ म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आज खऱ्या अर्थाने कोण कोणाची ‘बी टीम’ आहे हे जनतेसमोर आले आहे.” त्यांच्या या विधानाकडे राजकीय निरीक्षक विशेष लक्ष देत आहेत. भाजप-आरएसएसवरही घणाघात ठाकरे गटावर टीका करतानाच आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएसवरही जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “आरएसएस आणि भाजप देश तोडण्याचे काम करत आहेत. सीमांकन (Delimitation) विधेयकाचा सर्वात मोठा फटका दक्षिण भारताला बसणार आहे, तर त्याचा राजकीय फायदा उत्तर भारताला होणार आहे. भाजपचा राष्ट्रवाद हा केवळ दिखावा आहे.” 6 खासदारांच्या बंडानंतर वाढलेला राजकीय संघर्ष दरम्यान, ठाकरे गटातील संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील या सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने शिवसेनेतील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. उद्धव ठाकरे गट यामागे ‘ऑपरेशन टायगर’ असल्याचा आरोप करत आहे. तर शिंदे गटाचे नेते हे खासदार स्वेच्छेने आपल्या विचारांशी जोडले गेल्याचा दावा करत आहेत. अशा परिस्थितीत प्रकाश आंबेडकर यांनी केलेली टीका ही केवळ भाजपवर नव्हे, तर थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी मानली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!