निवडणुका जवळ आल्या की मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून विकासाचे मोठमोठे शब्द, रंगीबेरंगी जाहीरनामे आणि गगनाला भिडणारी आश्वासने दिली जातात. शहराच्या सर्वांगीण विकासाचे आराखडे मांडले जातात, मात्र निवडणुका पार पडल्यानंतर त्यातील किती आश्वासने प्रत्यक्षात उतरतात, यावर नेहमीच प्रश्न उपस्थित होतात. अशाच पार्श्वभूमीवर नांदेड महापालिका निवडणुकीत प्रचाराची एक आगळीवेगळी आणि लक्षवेधी पद्धत समोर आली असून, तिने संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका महिला उमेदवाराने थेट शासकीय बाँडवर लिहून देत वचनपूर्ततेची हमी दिल्याने ही निवडणूक केवळ राजकीय नव्हे, तर चर्चेचा विषय ठरत आहे. नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक लढवणाऱ्या नीता जैन या उमेदवाराने प्रचारात पारंपरिक पद्धतींपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारला आहे. मतदारांसमोर बोलून आश्वासने देण्याऐवजी त्यांनी ते थेट लेखी स्वरूपात दिले असून, तेही शासकीय बाँडवर. नीता जैन यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत प्रभागातील मूलभूत नागरी समस्या सोडवण्यात त्या अपयशी ठरल्या, तर त्या आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा देतील. राजकारणात क्वचितच दिसणाऱ्या या धाडसी भूमिकेमुळे त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जातात. अनेक वेळा निवडून आलेले लोकप्रतिनिधी आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप होतो. अशा परिस्थितीत शासकीय बाँडवर लिहून दिलेले हे वचन केवळ शब्दांचे नाही, तर जबाबदारी स्वीकारण्याचे प्रतीक मानले जात आहे. नीता जैन यांच्या या पावलामुळे ‘काम न झाल्यास राजीनामा’ ही संकल्पनाच चर्चेत आली असून, मतदारांमध्ये त्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आजवर अनेक उमेदवारांनी प्रचारादरम्यान मोठमोठी आश्वासने दिली, परंतु निवडणुकीनंतर त्याचा पाठपुरावा किती झाला, यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहिले. अशा पार्श्वभूमीवर नीता जैन यांचे हे लिखित आश्वासन मतदारांच्या नजरेत वेगळे ठरत आहे. प्रभाग क्रमांक 16 पुरतेच नव्हे, तर संपूर्ण नांदेड शहरात त्यांच्या या अनोख्या प्रचारपद्धतीची चर्चा सुरू आहे. काही नागरिक याकडे सकारात्मक आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणून पाहत आहेत, तर काही जण याला राजकीय धाडस मानत आहेत. या घटनेमुळे नांदेड महापालिका निवडणुकीतील प्रचाराला एक नवा आयाम मिळाल्याचे चित्र आहे. आश्वासनांच्या राजकारणात प्रत्यक्ष जबाबदारी स्वीकारण्याची ही पद्धत भविष्यात इतर उमेदवारांसाठीही उदाहरण ठरेल का, याबाबत राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मतदारांसमोर विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे लिखित वचन किती प्रभावी ठरेल, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. नीता जैन यांची ही रणनीती मतदारांना कितपत भावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रादेशिक पक्ष आणि आघाड्यांनीही ताकद पणाला लावली दरम्यान, नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, विविध पक्षांकडून सभा, कोपरा सभा, पदयात्रा आणि वैयक्तिक संपर्क मोहिमा राबवल्या जात आहेत. या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांसह 14 प्रादेशिक पक्ष आणि विविध आघाड्यांनीही आपली ताकद पणाला लावली आहे. स्थानिक प्रश्न, जातीय समीकरणे आणि विकासाच्या मुद्द्यांवरून प्रचार अधिक आक्रमक होताना दिसत आहे. 81 जागांसाठी 491 उमेदवार रिंगणात या निवडणुकीत एकूण 81 जागांसाठी 491 उमेदवार रिंगणात उतरले असून, त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांसारख्या प्रमुख पक्षांसोबतच प्रादेशिक पक्षांनीही आपली रणनीती आखली आहे. अशा चुरशीच्या वातावरणात नीता जैन यांचा शासकीय बाँडवरील शब्द मतदारांच्या निर्णयावर किती प्रभाव टाकतो, याचे उत्तर 16 जानेवारीला निकालाच्या दिवशीच मिळणार आहे.