भाजपची अवस्था ‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तराप्रमाणे झाली आहे. या चित्रपटात मास्तराला तमाशाचा इतका नाद लागला की मास्तरच तुणतुणे हातात घेऊन पुढे उभा राहायला लागला, अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. “ये बंद करने आए थे तवायफो के कोठे, मगर सिक्को की खणक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे,’ अशा शेरोशायरीतून जयंत पाटलांनी भाजपला टोला लगावला. सांगलीत प्रचार सभेत ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी वेगवेगळ्या आघाड्या एकत्र करून सत्ता बनवण्याचे नाकारल्याचे उदाहरण आहे. मात्र आज भाजप काय करतोय? सगळे काँग्रेसमधील ओढून भाजपमध्ये नेले आहेत. आता आपले गडीदेखील तिथे चाललेत. काँग्रेस सर्वधर्मसमभावाचा विचार घेऊन चालते म्हणून तुम्ही साथ दिली. काँग्रेस सोडून जातीयवादी झेंडा घेण्यापूर्वी त्या व्यक्तीने दहा वेळा विचार करायला पाहिजे. भाजपवाले ओवेसींसोबत बसतात जयंत पाटील म्हणाले, भाजपवाले सांगतात की ते हिंदुत्ववादी आहेत आणि अकोल्यात एमआयएमसोबत युती करतात. ओवेसींच्या मांडीला मांडी लावून बसतात. यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत हे लक्षात घ्या. सत्तेसाठी कुणाशीही आघाडी करायला यांना काही वाटत नाही. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेला भाजप आता काँग्रेसयुक्त झाला आहे.
