सुरेश पाचभाई | मारेगाव
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे ढोल वाजत असताना मारेगाव तालुक्यातील खापरी ग्रामस्थ मात्र आजही चिखल, खड्डे आणि उखडलेल्या रस्त्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. बुरांडा–खापरी या अडीच किलोमीटरच्या एकमेव रस्त्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे केवळ “मंजुरीत”च अडकलेला असून प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे नागरिकांचे हाल थांबण्याचे नाव घेत नाहीत.

सन २०२१–२२ मध्ये तब्बल १७ वर्षांनंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र त्यावेळीही लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने अडीच किलोमीटरपैकी फक्त दोन किलोमीटरवरच समाधान मानले. उर्वरित अर्धा किलोमीटर रस्ता पूर्णपणे उखडलेला असून चिखल, गिट्टी व खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळ्यात तर हा मार्ग नरकयातनेपेक्षा कमी नाही.

या अर्ध्या किलोमीटरच्या रस्त्यामुळे दुचाकी वाहनांचे पंचर होणे रोजचे झाले असून चारचाकी वाहन गावात पोहोचणे अशक्य झाले आहे. रुग्णाला दवाखान्यात नेणे म्हणजे जणू जीवघेणी परीक्षा ठरत आहे. शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. हा सगळा त्रास लोकप्रतिनिधींना दिसत नाही काय? असा सवाल आता ग्रामस्थ उघडपणे विचारत आहेत.
हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येतो. गेल्या चार वर्षांपासून ग्रामस्थ अधिकारी, अभियंते आणि लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र दरवेळी एकच उत्तर मिळते – “रस्ता मंजुरीत आहे.” तीन-तीन वर्षे मंजुरीसाठी लागतात काय? की खापरी गाव मतपेटीपुरतेच महत्त्वाचे आहे? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
निवडणुकीच्या काळात खापरी गावात हमखास हजेरी लावणारे आजी-माजी लोकप्रतिनिधी मतदान होताच गावाकडे पाठ फिरवतात. रस्त्याच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांची खैरात वाटण्याऐवजी प्रत्यक्ष काम करून दाखवावे, अशी संतप्त भावना गावात पसरली आहे.
“रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?” अशी अवस्था असलेल्या बुरांडा–खापरी रस्त्याचा उर्वरित अर्धा किलोमीटर भाग तातडीने पूर्ण करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही खापरी ग्रामस्थांनी दिला आहे.
