Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

विधिमंडळ विनोदांना जन्म देणारे ठिकाण:मी शब्दाशब्दाला ‘का बे’ ‘साल्या’ म्हणायचो, मुख्यमंत्र्यांच्या कोट्यांनी विधानभवनात पिकला हशा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुंबईत आल्यानंतर आपल्याला आलेल्या भाषिक अडचणीची आठवण सांगितली. मी मुंबई आलो तेव्हा सुरुवातीच्या काळात मला फार अडचणी आल्या. तेव्हा मी शब्दाशब्दाला ‘का बे’, ‘साल्या’ असे ‘सांस्कृतिक’ मराठी बोलायचो. पण इथे आल्यानंतर ही संस्कृती मुंबईला पटण्यासारखी नसल्याची बाब माझ्या लक्षात आली आणि मी माझी भाषा बदलली, असे ते म्हणाले. महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधील प्रमुख नेत्यांनी यावेळी आपली भूमिका मांडली. त्यात मुख्यमंत्र्यांनी अगदी विनोदी शैलीत नागपूरहून मुंबईत आल्यानंतर आलेले अनुभव कथन केले. यावेळी त्यांनी आपल्या खास वैदर्भीयन स्टाईलमध्ये केलेल्या कोट्यांमुळे उपस्थितांत एकच हशा पिकला होता. प्रत्येक भागातील मराठीचा गोडवा कायम राखण्याची गरज मुख्यमंत्री म्हणाले, आपली मराठी भाषा दर 5-7 किलोमीटरवर बदलते. मी मुंबईत आलो तेव्हा सुरुवातीच्या काळात मला फार अडचणी आल्या. कारण मी तेव्हा शब्दाशब्दाला ‘का बे’, ‘साल्या’ अशी ‘सांस्कृतिक’ मराठी बोलत होतो. पण इथे आल्यावर मला लक्षात आले की ही संस्कृती मुंबईला पटण्यासारखी नाही. पुण्यात तर आपल्याला बहिष्कृतच केले जाईल असे मला वाटले. त्यामुळे मी हळूहळू स्वत:ला चांगले मराठी कसे बोलता येईल या दिशेने नेले. पण प्रत्येक भागातल्या मराठीचा आपला गोडवा आपल्याला कायम ठेवायचा आहे. ते पुढे म्हणाले, आज आपण मराठी भाषेचा गौरव करत आहोत. या निमित्ताने आपण आपली भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लोकसाहित्य, लोककला, लोकनाट्य, लोकगीते आपल्याला जिवंत कशी ठेवता येतील हे बघावे लागेल. जगात इंग्रजी सर्वात मोठी भाषा आहे. कारण ती राज्यकर्त्यांची भाषा होती. राज्यकर्त्यांची भाषा ही जगाची भाषा होते. त्यामुळे आपणही आपल्या भाषेला ज्ञानभाषेत रुपांतरीत करण्याची गरज आहे. मराठी बोलणाऱ्याला मराठीमुळे प्रगती करता येते असा भाव आपण निर्माण करायला हवा, असे ते म्हणाले. विधिमंडळ हे विनोदांना जन्म देणारे ठिकाण मुख्यमंत्र्यांनी यावेळी विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांत होणारी भाषणे व प्रश्नोत्तरांमध्ये निर्माण होणाऱ्या विनोदांवरही भाष्य केले. ते म्हणाले, विधिमंडळ हे ही एकप्रकारे अनेक विनोदांना जन्म देणारे असते. आपले राजकीय क्षेत्र, तिथे घडणाऱ्या घटना, विनोद कमी केले, तर कदाचित मराठी नाटक व चित्रपट यांच्या कथानकांमध्ये 50 टक्के घट येईल, इतका मसाला आपण सगळे मिळून साहित्यिकांना देत असतो. त्यामुळे आपण देखील साहित्याची निर्मिती करत असतो. हल्ली घाबरत – घाबरत विनोद केले जातात मुख्यमंत्र्यांनी यावेळी नेतेमंडळी घाबरत – घाबरत विनोद करत असल्याचीही कोपरखळी मारली. पूर्वी विधानमंडळात भाषणांमध्ये विनोद, कोट्या, व्यंग अशा अनेक छटा पाहायला मिळायच्या. मागील 20-25 वर्षांत विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणांमध्ये एकमेकांवर केलेल्या कोट्या, त्यातून निर्माण होणारे विनोद असायचे. पण दुर्दैवाने अलिकडच्या काळात अनेकदा विनोदाला अस्मितेशी जोडले जाते. त्यामुळे त्या विनोदातील मर्म निघून जाते. आपल्या बोलण्यातून कोणता अर्थ निघेल व त्यातून माध्यमांमध्ये काय चाललेल या भीतीने माणूस घाबरत – घाबरत विनोद करायला लागला आहे. यामुळे आपल्या भाषणांतील निखळ आनंद कमी झाला आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!