राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. त्यांना घ्यायचे की नाही हे तुम्ही ठरवा, पण सत्तेशिवाय ते फार दिवस राहू शकत नाहीत. कधी उडी मारायची, याचीच ते वाट पाहत आहेत, असा टोला त्यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता लगावला. सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणूक प्रचारसभेत सदाभाऊ खोत बोलत होते. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्या कार्यकाळावर जोरदार टीका केली. त्यांनी समाजासाठी काहीच केले नाही सदाभाऊ खोत म्हणाले की, 20 वर्षे मंत्री राहूनही त्यांनी समाजासाठी काहीच केले नाही. साधे रस्तेही झाले नाहीत, कोणताही विकास केला नाही. जनता गरिबीतच राहावी आणि आपल्यासमोर गुलामासारखी यावी, या मानसिकतेतून त्यांनी काम केले. पण आता परिस्थिती बदलत आहे. काटे उलटे फिरू लागले आहेत. ते फार दिवस तिकडे बसणार नाहीत, लवकरच भाजपमध्ये येतील. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या स्मारकाचाही उल्लेख सदाभाऊ खोत म्हणाले की, यावेळी त्यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या स्मारकाचाही उल्लेख केला. क्रांतीसिंह नाना पाटील यांची सेवा नाईकवाडे यांनी केली, पण त्यांचे स्मारक उभारावे असे यांना कधी वाटले नाही. 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नावाने कॉलेजसाठी निधी मंजूर केला होता. मात्र सत्ता गेल्यानंतर त्या कॉलेजला निधी मिळू दिला नाही. आता पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर फडणवीसांनी तो निधी मंजूर केला, असा आरोप खोत यांनी केला. वाघवाडी फाट्यावरील काम तुम्ही सरकारमध्ये असताना का रोखले? ‘मी सोडून दुसरा कोणी मोठा होता कामा नये’ हीच तुमची मानसिकता आहे. जनता आता तुम्हाला थांबवणार आहे, असा घणाघाती टोला त्यांनी लगावला. जयंत पाटलांची खोतांवर टीका दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कुणीतरी म्हणाले की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार आहेत. दहा पक्ष बदलून गेलेला एक बाबा माझे नाव घेऊन बोलतोय. भाजपलाही माहिती आहे की हा कुणाचाच नाही, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी खोत यांचा समाचार घेतला.
