मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक 32 तास ठप्प; राज ठाकरेंचा संताप:वसूल करण्यात आलेला टोल परत करावा, सरकारकडे थेट मागणी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ज्वलनशील रसायन वाहून नेणारा टँकर मंगळवारी संध्याकाळी पलटी झाल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. या अपघातानंतर 32 तास महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत राहिली. अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्रीच्या अंधारात तासन्‌तास न हलणारी वाहनं, रडणारी लहान मुलं, खाण्यापिण्याची गैरसोय आणि पाण्याचाही तुटवडा, या सगळ्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत हजारो वाहनचालक आणि प्रवासी महामार्गावर अडकून पडले होते. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून सरकारवर टीका केली. अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा करण्यात आली असली, तरी त्याआधी सध्याचा प्रवास सुरळीत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या काळात प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेला टोल सरकारने परत करावा, अशी ठाम मागणीही त्यांनी केली. मूलभूत सुविधा न देता टोल वसूल करणे योग्य नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार,प्रशासन घेतं का? हा प्रश्न आहे. मंगळवार ३ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ च्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे पण योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला २४ वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे टोल वसुली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच. ते होतं जर टोल घेता, तर मग सरकार, टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं. कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की, रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ? परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेंव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा. हल्ली मुंबई-पुणे प्रवास हा नक्की किती तासांत होईल याबद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि ३२ तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे. ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. आणि चौकश्यांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे. सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरु असतात. पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे याचा सरकारने विचार करावाच. राज ठाकरे ।

Leave a Comment

error: Content is protected !!