तेलंगणात महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना:छगन भुजबळांचे अमित शाहांना पत्र; सामाजिक समतेवर घाला म्हणत कारवाईची मागणी

तेलंगणामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात उमटले आहेत. या घटनेचा निषेध करत ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तातडीने पत्र पाठवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “हा केवळ पुतळ्यावर झालेला हल्ला नसून सामाजिक समतेच्या विचारांवर झालेला घाला आहे,” अशा शब्दांत भुजबळांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात काही समाजकंटकांकडून महात्मा जोतिबा फुले यांची मूर्ती तोडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्रासह देशभरातून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. भुजबळांनी शहांना पाठवलेल्या पत्रात काय म्हटले? छगन भुजबळ यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अमित शाह यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, महात्मा फुले हे देशाचे थोर समाजसुधारक आहेत. त्यांच्या पुतळ्याची विटंबना होणे ही अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय बाब आहे. महात्मा फुले यांच्या पुतळ्यावरील हल्ला हा केवळ एका पुतळ्यावरचा हल्ला नसून, तो त्यांच्या संपूर्ण विचारांवर आणि सामाजिक समतेवर केलेला घाला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या गंभीर प्रकरणात जातीने लक्ष घालून या घटनेमागे जे कोणी मास्टरमाईंड असतील, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर देशद्रोहासारखी कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. दानवेंकडून कोश्यारींच्या विधानाची आठवण याच प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. “महात्मा फुले हे केवळ महाराष्ट्राचे नाहीत तर देशाची अस्मिता आहेत. ज्या राज्यामध्ये ही घटना घडली, त्या सरकारने याची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या पाहिजेत,” अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. यावेळी अंबादास दानवे यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाचाही संदर्भ दिला. “ज्यांनी आधी फुलेंचा अपमान केला होता, त्यांच्यावरही वेळीच कारवाई व्हायला हवी होती,” असे म्हणत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला. दरम्यान, तेलंगणातील या प्रकरणावरून आता केंद्रात आणि राज्यात राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. छगन भुजबळ यांच्या पत्रावर केंद्रीय गृह मंत्रालय काय पावले उचलते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… तेलंगणात महात्मा फुलेंची मूर्ती तोडण्याचा प्रयत्न:प्रकाश आंबेडकरांचा संताप, म्हणाले – हा दलित, आदिवासी, ओबीसींवर हल्ला तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात महात्मा जोतिबा फुले यांची मूर्ती तोडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमागे आरएसएसचा हात असल्याचा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. “हा केवळ जोतिबा फुलेंवर झालेला हल्ला नसून, तो दलित, आदिवासी, ओबीसी आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीवर झालेला हल्ला आहे,” अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी आपला संताप व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा…

Leave a Comment

error: Content is protected !!