सोलापूरमध्ये मागील सहा वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधांना लग्नाची जोड न मिळाल्याने आणि मुलीच्या कुटुंबीयांनी नकार दिल्याने, एका 28 वर्षीय तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरीश भास्कर बंडी (रा. वल्लभनगर, सोलापूर) असे या मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरीशचे त्याच्या नात्यातीलच एका तरुणीशी मागील सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या नात्याचे रूपांतर लग्नात व्हावे, यासाठी हरीशच्या कुटुंबीयांनी दोन वेळा मुलीच्या घरी जाऊन रीतसर मागणी घातली होती. मात्र, पत्रिका जुळत नाही असे कारण पुढे करत मुलीच्या आई-वडिलांनी या लग्नास स्पष्ट नकार दिला. हरीश होता मानसिक तणावाखाली लग्नास नकार मिळाल्यापासून हरीश तीव्र मानसिक तणावाखाली होता. त्याने एकदा तरी मुलीशी बोलू देण्याची विनंती केली होती, मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी ती मान्य केली नाही. मुलीचा मोबाईल बंद करण्यात आला होता. तिच्याशी कोणताही संपर्क होऊ न दिल्याने हरीश अधिकच खचला. घरच्यांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, पण विरहाच्या वेदनेतून त्याने शहरातील एका लॉजमध्ये जाऊन टोकाचे पाऊल उचलले. पैसे संपेपर्यंत वापर केला; नातेवाईकांचा संताप हरीशच्या निधनानंतर त्याच्या नातेवाईकांनी मुलीच्या कुटुंबावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. हरीशचा आर्थिक आणि मानसिक गैरफायदा घेतला गेला. त्याचे पैसे संपेपर्यंत त्याला सोबत ठेवले आणि नंतर पत्रिकेचे निमित्त करून त्याला सोडून देण्यात आले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कुटुंबीयांची मागणी याप्रकरणी संबंधित मुलगी, तिचे आई-वडील आणि भाऊ यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी हरीशच्या नातेवाईकांनी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. लॉजच्या रूममध्ये दुर्गंधी हरिष दोन दिवसांपूर्वी जुना पुणे नाका येथील भाग्यलक्ष्मी लॉजमध्ये 120 क्रमांकाची खोली भाड्याने घेतली होती. शनिवारी त्या खोलीतून दुर्गंधी सुटली. लॉजच्या व्यवस्थापनाने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी पाहिले असता, हरिष पंख्याला एका कापडाच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेह उतरवून शासकीय रुग्णालयात हलवले. कुटुंबीयांना माहिती दिली. शासकीय रुग्णालयात धावत आलेल्या आईने एकच हंबरडा फोडला आणि माध्यमांसमोर घडलेली घटना कथन केली, तो एकच सांगत होता, त्या मुलीला माझ्यासमोर उभे करा. परंतु तिचे पालक ऐकले नाहीत. त्यामुळे माझा हरिष गेला…