Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

चंद्रपूर मनपात ठाकरेंच्या शिवसेनेची भाजपसोबत युती:महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर, काँग्रेसचा अवघ्या एका मताने पराभव

चंद्रपूर महानगरपालिकेतील गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याचा मंगळवारी अत्यंत नाट्यमय शेवट झाला. “कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवा,” असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याची चर्चा सकाळी सुरू असतानाच, दुपारी मात्र ठाकरे गटाने चक्क भाजपशी हातमिळवणी करत सर्वांनाच धक्का दिला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत फिस्कटलेले गणित आणि भाजपने दिलेली महापौरपदाची ‘ऑफर’ यामुळे चंद्रपुरात नवे राजकीय समीकरण आकारास आले आहे. दरम्यान, आज चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक पार पडली. भाजपच्या संगीता खांडेकर आणि काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांच्या लढत होती. या चुरशीच्या लढतील निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांचा विजय झाला. काँग्रेसच्या उमेदवार वैशाली महाडोळे यांना ३१ मते पडली. तर संगीता खांडेकर यांना ३२ मत मिळाली. संगीता खांडेकर यांची अवघ्या मताने महापौरपदी वर्णी लागली आहे. मतदानावेळी वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक हे गैरहजर राहिले होते. तर एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतल्याने निकालावर निर्णायक परिणाम झाला. वडेट्टीवार-गिऱ्हेंची बैठक निष्फळ आज सकाळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांची बैठक झाली. या बैठकीत ठाकरे गटाने महापौरपदाची मागणी केली होती, मात्र वडेट्टीवार पाच वर्षांच्या कार्यकाळात एकदाही महापौरपद देण्यास तयार नव्हते. यामुळे संतापलेले संदीप गिऱ्हे बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडले. त्यानंतर काही वेळातच भाजपचे स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याची अधिकृत घोषणा केली. काय आहे सत्तेचा ‘फॉर्म्युला’? भाजप आणि ठाकरे गटामध्ये सत्तेच्या वाटणीचा ‘सव्वा-सव्वा’ वर्षांचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. पहिली सव्वा वर्षे भाजपकडे, त्यानंतरची सव्वा वर्षे ठाकरे गटाकडे असेल (प्रत्येकी दोन टर्म). ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे पाच वर्षे उपमहापौर राहतील. पहिल्या आणि चौथ्या वर्षाचे सभापतीपद ठाकरे गटाला देण्यात आले आहे. संख्याबळाचे गणित आणि जोरगेवारांची भूमिका चंद्रपूर मनपात ६६ जागांपैकी काँग्रेसकडे २७ जागांचे बलाबल असूनही त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. भाजपकडे २३ आणि ठाकरे गटाकडे ६ जागा आहेत. जोरगेवार म्हणाले की, “आमच्या नेत्यांची महापौरपद सोडण्याची इच्छा नव्हती, पण शहराच्या विकासासाठी आणि स्थिर सत्तेसाठी आम्ही ठाकरे गटाची मागणी मान्य केली.” संदीप गिऱ्हे काँग्रेसवर नाराज “आम्ही विकासासाठी भाजपसोबत गेलो आहोत,” असे स्पष्टीकरण संदीप गिऱ्हे यांनी दिले. “विजय वडेट्टीवार आम्हाला कुठेही महापौरपद द्यायला तयार नव्हते. याउलट किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार आमच्या संपर्कात होते आणि त्यांनी सन्मानजनक वाटा दिला,” असेही त्यांनी नमूद केले. विजय वडेट्टीवार काय म्हणाले? ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे हे विजय वडेट्टीवार यांच्यासोबतच्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आमच्याकडे ३१ नगरसेवक आहेत. उद्धवसेनेला आम्ही स्थायी समिती अध्यक्ष पदाची ऑफर दिली. गरज पडली तर त्यांना उपमहापौर पद देऊ. त्यांना महापौर पद पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आणि त्यावर आमची चर्चा सुरू आहे. नाही झाले तर विरोधी पक्षात बसू,” असे विजय वडेट्टीवार म्हणाले. “उद्धवसेनेला भाजपाकडून फूस आहे. भाजपाने उद्धवसेनेला ऑफर दिलेली आहे. आम्ही पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आमची संख्या ३१ पर्यंत गेली आहे. पण, बहुमताचा आकडा ३४ आहे. त्यात तीनची आवश्यकता आहे. आम्ही स्थायी समिती आणि उपमहापौर पद द्यायचे कबूल केले, पण त्यांना भाजपाकडून ऑफर असल्याची त्यांनी माहिती दिली. ते निघून गेले. आता मी आणि खासदार यावर चर्चा करू”, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले. सकाळपर्यंत आक्रमक, दुपारी भाजपला पाठिंबा दरम्यान आज सकाळीच संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना “भाजपला मदत होणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे,” असे सांगितले होते, मात्र काही तासांतच स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!