प्रशासनाची शेतकरी सहाय्यक धोरणे, समाजाचा सहभाग आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे शेतकरी आत्महत्या थांबवण्यात यश मिळवता येईल, असे प्रतिपादन सोशल फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेला निशुल्क बी-बियाणे वाटप कार्यक्रम तसेच क्रांतिज्योती सावित्रीआई फुले गौरव पुरस्कार सोहळा दरम्यान पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी केले. आयोजित कार्यक्रमात पद्मश्री शंकरबाबा पापळकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, सोशल युवा फोरमचे डॉ अभ्युदय मेघे, अविनाश सातव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रशासनाची शेतकरी सहाय्यक धोरणे, समाजाचा सहभाग आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होऊ शकते, शेतकऱ्यांनी शेतीसोबतच गोपालन व बकरीपालनासारखे जोडधंदे स्वीकारून आर्थिक स्थैर्य मिळवावे, असे प्रतिपादन आयोजित कार्यक्रमात पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी केले. ज्ञानदा फणसे यांनी वर्धा सोशल फोरमच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत पुरस्कार प्राप्त महिलांचे अभिनंदन केले. उपविभागीय कृषी अधिकारी वैशाली शिंदे यांनी शेतकऱ्यांना घन कपाशी लागवडीबाबत मार्गदर्शन करत पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन पेरणीची घाई न करण्याचे आवाहन केले. यावेळी पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या अनाथालयातील अंध विद्यार्थिनी गांधारी हिने सादर केलेल्या गीताने उपस्थितांची मने जिंकली. तिचाही विशेष सन्मान करण्यात आला. यंदाही अनेक दानशूर व्यक्ती व कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. जिल्हाभरातील सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी पुरोहित यांनी तर आभार प्रदर्शन श्याम परसोडकर यांनी केले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी बी-बियाणे वाटप सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. चेतना सवाई, तबस्सुम आझमी, कांचन रघटाटे, अश्विनी रवी काळे यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. वर्धा सोशल फोरमचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी बी-बियाणे वाटपाचा हा उपक्रम अकराव्या वर्षात पदार्पण करत आहे.
