राज्यभरात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक शहरात इच्छुक उमेदवार, पक्षनेते आणि कार्यकर्ते सक्रिय झाले असून, सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएमसीच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. याच पार्श्वभूमीवर काल मुंबईत मोठी राजकीय घडामोड घडली. अनेक वर्षांच्या मतभेदांनंतर मनोमिलन होत ठाकरे बंधू, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्याची अधिकृत घोषणा केली. या घोषणेसह बीएमसी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला असून, महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा थेट सामना रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या घडामोडींमुळे मुंबईच्या राजकारणात एकीकडे चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. आपल्या हटके वक्तव्यांमुळे आणि आक्रमक भूमिकेमुळे ओळखले जाणारे गुणरत्न सदावर्ते हे विशेषतः ठाकरे बंधूंवर सातत्याने टीका करताना दिसतात. ठाकरे बंधूंविरोधातील त्यांच्या वक्तव्यांमुळे ते यापूर्वीही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असताना, सदावर्ते यांनी पुन्हा एकदा वेगळ्याच कारणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी त्यांच्या वक्तव्यांपेक्षा त्यांच्या एका अनोख्या खुर्चीची अधिक चर्चा होताना दिसत आहे. सध्या गुणरत्न सदावर्ते हे मुंबईतील परळ परिसरात असलेल्या क्रिस्टल टॉवर या इमारतीत वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे, या इमारतीच्या अगदी समोरच त्यांचे अत्याधुनिक आणि सुसज्ज असे कार्यालय आहे. याच कार्यालयात ते अनेकदा पत्रकार परिषद घेऊन राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आक्रमक भूमिका मांडताना दिसतात. आतापर्यंत साध्या खुर्चीवर बसून पत्रकारांशी संवाद साधणारे सदावर्ते आता मात्र एका वेगळ्याच खुर्चीवर विराजमान होताना पाहायला मिळणार आहेत. कमळाच्या रचनेवर आधारित, महाराजांच्या सिंहासनासारखी भासणारी ही भव्य खुर्ची सध्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. या खुर्चीमुळे सदावर्तेंची प्रतिमा आणखी वेगळ्या पद्धतीने समोर येत असल्याचे दिसून येते. या कमळ प्रतिकृती असलेल्या खुर्चीमागचा नेमका हेतू काय, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. गुणरत्न सदावर्ते हे अनेक वेळा सार्वजनिक मंचांवर आणि माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उघडपणे प्रशंसा करताना दिसले आहेत. त्यामुळे कमळाच्या आकाराची ही खुर्ची राजकीय संकेत देणारी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, यावर सदावर्ते यांच्याकडून अद्याप कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे ही खुर्ची केवळ एक वैयक्तिक आवड आहे की आगामी राजकीय भूमिकेचा संकेत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, ठाकरे बंधूंची युती, बीएमसी निवडणूक आणि सदावर्तेंची ही ‘राजेशाही खुर्ची’ या सगळ्या गोष्टी एकत्र येत मुंबईच्या राजकारणाला वेगळीच धार मिळताना दिसत आहे. कमळ सदृश खुर्चीमागील अर्थाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या पार्श्वभूमीवर नजर टाकली तर ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून, शिक्षणासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई येथे वास्तव केले आहे. त्यांनी एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण घेतले असून, विद्यार्थी दशेतच विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. पुढे त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि मुंबईत स्थायिक होऊन वकिली सुरू केली. 2018 साली महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास (SEBC) प्रवर्गाअंतर्गत दिलेल्या आरक्षणाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या खटल्यामुळे ते राज्यभर चर्चेत आले. ते आणि त्यांची पत्नी वकील जयश्री पाटील हे दोघेही विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर सातत्याने व्यक्त होत असतात. आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदावर्ते पुन्हा चर्चेत आले असून, त्यांच्या पुढील भूमिकेकडे आणि या कमळसदृश खुर्चीमागील अर्थाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
