मराठवाड्यात इयत्ता बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून काही दिवसांतच इयत्ता दहावीच्या परीक्षांना सुरवात होणार आहे. या परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावरील वीज पुरवठा खंडीत होऊ नये याची दक्षता घ्यावी. वीज पुरवठा खंडीत झाल्यास त्याची गंभीर दखल घेण्याचा इशारा वीज कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांनी दिला आहे. राज्यात इयत्ता बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. त्यानुसार मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात ४४९ केंद्रावर ७७६६ वर्ग खोल्यांमध्ये १.९१ लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत. तर लातुर विभागीय मंडळात २५३ परीक्षा केंद्रावर ३९६० वर्ग खोल्यांमधून ९६ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या शिवाय इयत्ता दहावीच्या परीक्षांनाही लवकरच सुरवात होणार आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात ६४३ परीक्षा केद्रांमधून ९०९४ वर्ग खोल्यांमध्ये १.९१ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर लातुर विभागीय मंडळात ४१८ परीक्षा केंद्रावरील ४८८८ वर्ग खोल्यांमधून १.११ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दरम्यान, मराठवाड्यातील आठही जिल्हयांमधून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी वर्ग खोल्यांमधून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूुचना देण्यात आल्या आहेत. या शिवाय विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्य घडवण्यात त्यांचे महत्त्वाचे स्थान असून सदर बाब लक्षात घेता परीक्षेच्या वेळेत वीज पुरवठ्यात कोणताही व्यत्यय आल्यास परीक्षांच्या आयोजनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. संपूर्ण परीक्षेच्या कालावधीत सुरळीत वीजपुरवठा आवश्यक आहे. त्यासाठी परीक्षेच्या वेळेत कोणतेही नियोजित वीज बंद केले जाणार नाहीत. तसेच वीज बंद निवेदन देवून वीज पुरवठा बंद करण्यात येवू नये याची खबरदारी घ्यावी. वीज पुरवठा सुरळित ठेवण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी जलद प्रतिसाद पथके तयार ठेवावीत, आवश्यक तांत्रिक साहित्याची उपलब्धता करून ठेवावी आणि कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्यास त्वरित दोष दुरुस्त करावेत. परीक्षा केंद्रांवर वीज खंडित होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या कोणत्याही त्रुटीची गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल असा इशारा विज कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांनी दिला आहेत.