काँग्रेस नेत्यांनी लाथाडल्यामुळेच भाजपसोबत हातमिळवणी:उद्धव ठाकरे गटाने ऐनवेळी भूमिका का बदलली? पडद्यामागचा तपशील

चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत लागलेल्या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. संख्याबळ काँग्रेसकडे असूनही महापौरपद भाजपच्या वाट्याला गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले. या निकालानंतर ठाकरे गटावर टीका सुरू झाली असताना, जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी स्थानिक परिस्थिती, काँग्रेससोबत झालेल्या चर्चांचा अनुभव आणि घेतलेल्या निर्णयामागील कारणे सविस्तरपणे मांडली. चंद्रपूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीच्या गणितानुसार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट एकत्र असल्यामुळे महापौरपद सहज मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र मतदानाच्या वेळी परिस्थिती वेगळीच घडली आणि भाजपने बाजी मारली. या निकालामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. विशेषत: उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत कधीही हातमिळवणी करणार नाही, अशी भूमिका पूर्वी स्पष्ट केलेली असतानाही स्थानिक स्तरावर वेगळा निर्णय झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ठाकरे गटावर टीका करण्यात आली. त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी काँग्रेसलाच लक्ष्य केले. 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता मिळवता आली नाही, याची काँग्रेसने लाज वाटली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. या वक्तव्यामुळे वाद आणखी वाढला. मात्र यानंतर ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी माध्यमांसमोर येत स्थानिक पातळीवरील घडामोडी स्पष्ट केल्या. संदीप गिर्हे म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निर्देश स्पष्ट होते की महाविकास आघाडीसोबत राहायचे. त्यानुसार आम्ही काँग्रेस नेत्यांशी सातत्याने संपर्कात होतो. त्यांनी जिथे बोलावले तिथे चर्चा करण्यासाठी आम्ही गेलो. निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत आणि मतदानाच्या दिवशीही शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबत चर्चा सुरू होती. मात्र काँग्रेसकडून आम्हाला शिवसेनेची गरज नसल्याचे वारंवार सांगितले जात होते, असा आरोप त्यांनी केला. गिर्हे यांनी पुढे सांगितले की, या वागणुकीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत होती. वारंवार अपमान होत असल्याची भावना निर्माण झाली होती. ही सर्व परिस्थिती आम्ही वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवली. संजय राऊत यांच्याशी थेट संपर्क साधता आला नाही, मात्र इतर नेत्यांमार्फत स्थानिक परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही निर्णय घेतला. पक्ष आणि कार्यकर्ते टिकले पाहिजेत, ही आमची भूमिका होती, असे गिर्हे म्हणाले. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाबाबत देखील आम्हाला संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. ती निवडणूक पूर्ण झाल्यानंतर आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत आणि संपूर्ण परिस्थिती समजावून सांगणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले. आघाडीतील समन्वय आणि स्थानिक पातळीवरील संबंध या सगळ्या घडामोडींमुळे चंद्रपूरमधील महापौर निवडणूक केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित राहिली नाही, तर राज्यातील महाविकास आघाडीतील समन्वय आणि स्थानिक पातळीवरील संबंध यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संदीप गिर्हे यांच्या वक्तव्यामुळे या निकालामागील स्थानिक कारणे पुढे आली असली तरी या प्रकरणावर पुढे काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!