लोक भाजपकडे नेहमी संशयाने पाहतात. भाजपने खांद्यावर हात टाकले तरी लोक म्हणतात, हा मेला. भाजप म्हणजे विषारी सापासारखी पार्टी आहे. भाजपसोबत न दोस्ती, न दुश्मनी ठेवलेली बरी आम्ही तर दुश्मनी करुण बसलो, ते कधीही नाग पाठवू शकतात, अस म्हणत माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर टीका केली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे अकाली निधन झाले, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मुंबईहून बारामतीला येत असताना लँडिंगपूर्वी विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर झालेल्या स्फोटात पवारांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच बच्चू कडू यांनी एका मराठी वृत्तवाहिनिशी बोलताना भाजपवर टीका केली आहे. टेंडरच्या माध्यमातून खाताय बच्चू कडू म्हणाले की, पूर्वी सिव्हिल सर्जनला असलेले औषध खरेदीचे अधिकार आता मंत्रालयाने स्वतःकडे घेतल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळत असून, कमिशनसाठी औषधे महाग केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणारेच आज टेंडरच्या माध्यमातून सर्वाधिक भ्रष्टाचार करत असल्याचे सांगत, त्यांनी एमआरइजीएसचे पैसे आणि दिव्यांगांच्या रखडलेल्या पगारावरून सरकारला धारेवर धरले. ज्या दिव्यांगांना दोन पाय नाहीत, त्यांचे पगार वेळेवर न देणाऱ्यांच्या कानफटात मारण्याची वेळ आता आली आहे, असेही ते आक्रमकपणे म्हणाले. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून पैसे काढले बच्चू कडू म्हणाले की, पंधराशे रुपये देऊन मते मिळवण्याचा प्रयत्न होत असला तरी, दुसरीकडे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सरकार जनतेचे पैसे लुटत असल्याचे गणित त्यांनी मांडले. एकीकडून द्यायचे आणि दुसरीकडून काढून घ्यायचे ही सरकारची नीती आहे, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, तर महाराष्ट्रात रेल्वे चालू देणार नाही, असा इशारा देत त्यांनी आगामी काळात गनिमी काव्याने आंदोलन करण्याचे संकेत दिले आहेत.