राज्यातील 12 पैकी 12 ZP महायुतीकडे, उद्धव ठकरेंची पहिली प्रतिक्रिया:म्हणाले- पैशाचा महापूर, तरी निष्ठेची भिंत कोसळली नाही

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांनी ग्रामीण राजकारणाचा कल स्पष्ट केला आहे. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीने सर्व 12 जिल्हा परिषदांवर विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा अधोरेखित केले. आठ जिल्हा परिषदांमध्ये भाजप, तीन ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) आणि पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली. नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही विजय मिळवत भाजपने राज्यात आपली ताकद सिद्ध केली आहे. या निकालांमुळे महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः ग्रामीण भागात अपेक्षित कामगिरी न झाल्याने आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत पराभव मान्य केला, तरीही कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारे वक्तव्य केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, संघर्षाच्या काळातही पक्षाचे कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहिले, हीच खरी ताकद आहे. उरण आणि रायगड येथील शिवसेना उबाठाच्या विजयी उमेदवारांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत ठाकरे यांनी सर्वांचे अभिनंदन करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. प्रतिकूल परिस्थितीतही विजय मिळवणाऱ्या उमेदवारांचे कौतुक करत त्यांनी म्हटले, तुम्ही खरोखरच कमाल केली आहे. कठीण वातावरणातही तुम्ही यश मिळवलंत, हे कौतुकास्पद आहे. उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत पैशाचा मोठा प्रभाव असल्याचे सूचित करत अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. निवडणुकीत पैशाचा महापूर होता, तरीही निष्ठेची भिंत कोसळली नाही. लोक आजही आपल्याकडे आशेने पाहतात, असे ते म्हणाले. त्यांनी कार्यकर्त्यांना निराश न होता आगामी लढतींसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, आजची परिस्थिती आपल्या विरोधात असली, तरी उद्याचा काळ आपलाच असेल. तुम्ही या निवडणुका ज्या धैर्याने लढलात, त्यातूनच आपली ताकद दिसते. या शब्दांत त्यांनी पराभवाची खंत व्यक्त न करता आत्मविश्वास दाखवला. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्ष पुन्हा संघटित होऊन मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले. निष्ठावंत कार्यकर्त्यांना नवी उर्जा दिली ग्रामीण महाराष्ट्राचा कणा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निकालांनी राजकीय समीकरणे बदलली असली, तरी उद्धव ठाकरे यांनी या प्रसंगी सकारात्मक भूमिका घेतली. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांनी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना नवी उर्जा दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आगामी काळात शिवसेना उबाठा पुन्हा जोमाने राजकारणात सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!