राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या प्रश्नांची उकल व्हावी, यासाठी सर्व पक्षीय आमदारांनी अधिवेशनात सरकारला जाब विचारावा, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असताना त्यांनी सामाजिक माध्यमावर पोस्ट करत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. या अधिवेशनात केवळ आर्थिक तरतुदी नव्हे, तर राज्यातील गंभीर प्रश्नांवर सखोल चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्यात महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटना वाढत आहेत. या प्रकरणांवर गंभीर चर्चा होऊन ठोस उपाययोजना जाहीर व्हायला हव्यात. भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या व्यापार कराराबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करावे, अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांमुळे कोसळणारे पूल, खचणारे रस्ते यावर कठोर कारवाई व्हावी. राज्यातील बंद पडणाऱ्या मराठी शाळा, ढासळलेली आरोग्य व्यवस्था, वाढती बेरोजगारी आणि परराज्यात स्थलांतरित होणारे उद्योगधंदे या विषयांवर उत्तरदायित्व निश्चित व्हावे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. या सर्व प्रश्नांपेक्षा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवार यांच्या मृत्यूचे गूढ उलगडणे, असे रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केले. आमचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या मृत्यूमागचे सत्य समोर यावे, अशी त्यांची मागणी आहे. जर चौकशी प्रक्रियेत अपेक्षित गती दिसली नाही, तर आमदार रोहित पवार यांच्यासह पक्ष सातत्याने पाठपुरावा करेल, असे त्यांनी सांगितले. मात्र ही केवळ एका पक्षाची बाब नसून सर्व पक्षीय आमदारांनी सभागृहात सरकारला जाब विचारावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेची पार्श्वभूमीही गंभीर आहे. 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. धावपट्टीवर उतरताना विमान कोसळले आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी 29 जानेवारीला बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आला, मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमान अपघाताबाबत अनेक शंका या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत काही मुद्दे मांडत घातपाताचा संशय व्यक्त केला होता. त्यांच्या मते, अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, त्यात आवश्यकतेपेक्षा जास्त इंधन होते, त्यामुळे स्फोटाची तीव्रता वाढली. तसेच वैमानिक सुमित कपूर यांनी विमान मुद्दाम जमिनीवर आदळले असावे, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या सर्व दाव्यांमुळे प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. त्यामुळे संपूर्ण घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे, अशी मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे. आगामी अधिवेशनात या मुद्द्यावर काय चर्चा होते आणि सरकार काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. रोहिणी खडसे यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. मला आशा आहे की या अधिवेशनात
– राज्यातील महिला-मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणांवर चर्चा होऊन या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस निर्णय होईल
– भारत आणि अमेरिकेत जो व्यापार करार झाला आहे. त्याबाबत सरकार उत्तर देईल आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संरक्षण देईल
– भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारामुळे पडणारे पूल, खचणारे रस्ता यावर काही तरी ठोस उपाययोजना होईल तसेच भ्रष्टाचाऱ्यांना चाप बसवली जाईल
– राज्यातील बंद पडणाऱ्या मराठी शाळा, कोसळलेली आरोग्य यंत्रणा, बेरोजगारी, परराज्यात जाणारे उद्योगधंदे यावर उत्तर मिळेल
– आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या मृत्यूचे गूढ उकलेल तसे ना झाल्यास आमचे रोहित दादा पवार तर पाठपुरावा करतच आहेत पण सर्व पक्षीय आमदार देखील याबाबत सरकारला सभागृहात जाब विचारेल
ही अपेक्षा
