राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यावर राज्य सरकारने आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, केवळ तस्करच नव्हे तर त्यांना नकळत मदत करणाऱ्या कुरीयर कंपन्यांनाही आता कायद्याच्या कचाट्यात आणले जाणार आहे. “कुरीयर कंपन्यांनी पार्सल स्वीकारताना त्यात ड्रग्ज नाही याची खात्री केली पाहिजे. अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. कृत्रीम ड्रग्जसाठी लागणारी रसायने आयात करणाऱ्या कंपन्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सरकारची ड्रग्ज बाबत ‘झिरो टॉलरन्स’ पॉलिसी आहे. पोलिस अधिकारी सहभागी सापडले तर थेट बडतर्फ केले जात आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा सभागृहात बोलताना दिली. विधानसभेत कामाकाजादरम्यान प्रश्नोत्तराच्या अनेक सदस्यांकडून राज्यातील ड्रग्ज प्रकरणावरून प्रश्न उपस्थित केले. १६०० कोटींचे ड्रग्ज पकडले जात असतील, तर मुंबईत मेक्सिकोसारखी परिस्थिती होण्याची भीती व्यक्त केली. तर श्रीरामपूर मतदारसंघाचे काँग्रसचे आमदार हेमंत ओगले यांनी कुरीयरच्या माध्यमातून ड्रग्जची तस्करी केली जात असल्याचे सांगितले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपरोक्त उत्तर दिले. नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ड्रग्जचा विषय हा महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये कुरीयर्सवर देखील आपण कारवाई सुरू केली आहे. सगळ्या कुरीयरमध्ये राज्य सरकारची पथके पाठवलेली आहेत. कुरीयर कंपन्यांना सेन्सटायझ केले आहे. त्यांच्यावरही जबाबदारी टाकलीये की, त्यांनी जर तपासणी न करता अशाप्रकारचे कुरीयर डिलिव्हर केले. पाठवणारा तर दोषी असेलच, पण कुरीयरवाल्यांनाही त्यात दोषी पकडले जाईल, असा इशारा फडणवीसांनी दिला. सोशल मीडिया आणि ‘इन्स्टाग्राम’वर सरकारचा वॉच फडणवीस म्हणाले, अलिकडच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने ड्रग्जची वाहतूक केली जाते. आता इन्स्टाग्रामसारखी सोशल मीडिया ॲप देखील मार्केट प्लेस म्हणून वापरली जातात आणि त्याद्वारे डिलिव्हरी केली जाते. पण सगळ्या गोष्टींकडे सरकारचे लक्ष आहे. १६०० कोटींचे ड्रग्ज पकडले जात आहेत. याचे कारण म्हणजे दुर्दैवाने जे काही केमिकल ड्रग्ज तयार होतात, हे तयार करण्यासाठी कुठलीही मोठी व्यवस्था लागत नाही. त्यासाठी फॅक्टरी लागत नाही. एखाद्या छोट्याशा ठिकाणी ड्रग्ज तयार करतात. हे ड्रग्ज अतिशय घातक प्रकारचे आहेत. त्यावरही सरकाकडून कारवाई सुरू आहे. ड्रग्जसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर करडी नजर ड्रग्जसाठी जे साहित्य लागते, त्याचे लायसन्सेस कोणकोण आहेत? ते जो माल घेतात, तो बरोबर वापरतात की नाही? या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊन आहोत. यासंदर्भात सरकारची भूमिका १०० टक्के झिरो टॉलरन्सीची आहे. जिथे पोलिसवाले सापडतात, त्यांना आम्ही निलंबित नाही, तर बडतर्फ करत आहोत. ड्रग्जच्या प्रकरणातील कारवाईत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना दिले.
