मुंबईत आज सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आणणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे या पाहणी करत असताना, त्यांच्यासमोर महापालिकेचा एक अधिकारी रस्त्यावरील उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याची घटना गांधी नगर परिसरात घडली. या थरारक आणि गंभीर प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मुंबईकरांमधून मुंबई महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुंबईत दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने अनेक सखल भागांत आणि रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे. गांधी नगर परिसरातही रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. पावसाची पाहणी करण्यासाठी आणि पाणी उपसण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापौर रितू तावडे या अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह तिथे उपस्थित होत्या. अंदाज न आल्याने दुर्घटना रस्त्यावर प्रचंड पाणी साचल्यामुळे खाली मॅनहोल उघडे आहे की बंद, याचा अंदाज येत नव्हता. महापौरांच्या समोरून चालत जात असताना बीएमसी अधिकाऱ्याचा पाय थेट या उघड्या मॅनहोलमध्ये गेला आणि तो त्यात पडला. सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या इतर नागरिकांनी आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेत त्या व्यक्तीला वेळीच बाहेर काढले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या दुर्घटनेत बीएमसी अधिकारी प्रचंड घाबरला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. महापौरांचे आदेश अन् काही वेळातच समोर घडली घटना विशेष म्हणजे, मुंबईत ठिकठिकाणी मॅनहोल उघडे असल्याच्या तक्रारी आल्यानंतर नुकतेच महापौर रितू तावडे यांनी एक कठोर पत्रक काढले होते. “शहरात मॅनहोल उघडे ठेवणाऱ्या संबंधित कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल,” असे स्पष्ट आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले होते. मात्र, हे आदेश देऊन काही तास उलटत नाही तोच स्वतः महापौरांच्या समोरच हा प्रकार घडल्याने बीएमसीच्या मान्सूनपूर्व नियोजनाचे आणि दाव्यांचे पितळ उघडे पडले आहे. मुंबईकरांचा संताप: दरवर्षी तेच रडगाणे! दरवर्षी पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमुळे अनेक निष्पाप मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागतो. उच्च न्यायालयाच्या फटकारेनंतरही पालिका प्रशासन ढिम्म आहे. आज थेट मुंबईच्या प्रथम नागरिकाच्या डोळ्यांसमोर हा प्रकार घडल्याने आता तरी दोषी अभियंते आणि वॉर्ड अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई होणार का? की नेहमीप्रमाणे केवळ कागदी घोडे नाचवले जाणार? असा संतप्त सवाल मुंबईतील जागरूक नागरिक विचारत आहेत. या घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी संबंधित वॉर्डच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळावरूनच कडक शब्दांत धारेवर धरले असून, या निष्काळजीपणासाठी जबाबदार असणाऱ्यांवर आजच्या आज काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
