मरीनड्राईव्ह पोलिसांचा रोहित पवारांच्या अर्जावर महत्त्वाचा निर्णय:काल गुन्हा दाखल करण्यास नकार, आज पुढील कार्यवाही, नेमके काय घडले

दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) आणि व्हीएसआर विमान कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. काल ते मुंबईतील मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी रोहित पवार आणि पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचेही समोर आले. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली होती. आता या प्रकरणात मरीनड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवार यांच्या तक्रारीबाबत निर्णय घेतला आहे. मरीनड्राईव्ह पोलिसांकडे रोहित पवार यांनी दिलेला अर्ज पुढील तपासासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या पुणे येथील विशेष तपास पथकाकडे (SIT) असल्याने तक्रार त्यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी पत्राद्वारे रोहित पवार यांना दिली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनप्रकरणी व्हीएसआर कंपनी, डीजीसीए आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवावा, अशी स्पष्ट मागणी रोहित पवार यांनी अर्जात केली होती. मात्र स्थानिक पातळीवर एफआयआर नोंदवण्याऐवजी तक्रार पुढील तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आल्याने नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, आज रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाले. डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहोचले असून स्थानिक वकिलांची टीमही उपस्थित आहे. मात्र बारामती पोलिसांकडूनही केवळ तक्रार स्वीकारून गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी अर्ज स्वीकारला तरी अधिकृत एफआयआर नोंदवला जाईल का, याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामती पोलिस ठाण्याबाहेर आज मोठी घोषणाबाजी झाली. डीजीसीए आणि व्हीएसआरविरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे, असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. स्थानिक वकिलांनीही कायद्यानुसार गुन्हा नोंद होऊ शकतो, असे मत मांडले. पोलिस ठाण्याचा परिसर घोषणांनी दणाणून गेला. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे, मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशा घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण इतके खराब केले की माणसात माणूस राहिला नाही. बारामतीच्या देहातील आत्मा निघून गेला. आमच्या देवाला, अजितदादांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. न्यायासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार एकीकडे मरीनड्राईव्ह पोलिसांनी तक्रार SITकडे वर्ग केल्याची अधिकृत माहिती दिली आहे, तर दुसरीकडे बारामतीत प्रत्यक्ष गुन्हा नोंदवण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणात पुढे काय घडते, पोलिसांची भूमिका काय राहते आणि SITकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. रोहित पवारांनी न्यायासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून पुढील काही दिवसांत या प्रकरणाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!