‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनाला कात्री लागल्याने पिके करपण्याच्या मार्गावर:शेतकरी हवालदिल, उपलब्ध पाणी पिण्यास व फळबागांसाठी देण्याचा निर्णय

श्रीगोंदे तालुक्याला वरदान ठरलेल्या कुकडी लाभक्षेत्रात यंदा तीव्र उन्हाळा आणि अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे मोठे जलसंकट निर्माण झाले आहे. कुकडी प्रकल्पाचे उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन रद्द करून उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी व फळबागांसाठीच देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे लाभक्षेत्रातील उन्हाळी पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जून महिना सुरू झाला तरी उन्हाची तीव्रता कायम असून पावसानेही पाठ फिरवल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. २४ मे रोजी रोहिणी नक्षत्र सुरू झाले असले तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी, परिसरातील विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. शेतकऱ्यांना कुकडीचे दुसरे आवर्तन मिळेल, अशी मोठी अपेक्षा होती. मात्र जलसंपदा विभागाने उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन आवर्तनाला कात्री लावली आहे. जलसंपदा विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ मेपासून सुरू केलेले आवर्तन केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आणि फळबागांसाठी मर्यादित ठेवण्यात आले आहे. पहिल्या आवर्तनातही अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित पाणी मिळाले नव्हते; केवळ चारा ओला होईल इतकेच पाणी मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. आता दुसऱ्या आवर्तनातही सामान्य शेतीपिकांना पाणी नाकारल्याने शेतकरी वर्ग पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. त्यातच भीषण उष्णतेमुळे कालव्यांमधील आणि जलसाठ्यातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पिकांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. पाणी उशाला अन् कोरड घशाला कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी वाटपाच्या धोरणावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आठमाही धोरण असतानाही पाणी वितरणाचे स्पष्ट व न्याय्य नियोजन होत नसल्याची शेतकऱ्यांची मुख्य तक्रार आहे. करमाळा, कर्जत आणि कोळवडी भागातून पाणी पुढे गेल्यानंतर श्रीगोंदे तालुक्यात पाणी पोहोचेपर्यंत अनेक ठिकाणी पिके व फळबागा कोमेजून जात असल्याचे विदारक वास्तव शेतकऱ्यांनी मांडले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!