केंद्रीय आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनातर्फे शेगाव येथे आयोजित ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा’ सर्वसामान्यांच्या हिताऐवजी केवळ सरकारी निधीच्या उधळपट्टीचे केंद्र ठरल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी अवघ्या दोन दिवसांकरिता 4 कोटी 10 लाख रुपये खर्चून उभारलेले हेलिपॅड आता उखडले जाणार असून, हा जनतेच्या पैशांचा शुद्ध चुराडा असल्याची टीका त्यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान शेगाव येथे राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादी द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते काल करण्यात आले. मात्र, या आरोग्य मेळाव्यासाठी तब्बल 10 ते 15 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली असून, या मेळाव्याचा फायदा एकाही शेतकऱ्याला न झाल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. तसेच द्रौपदी मूर्मू यांच्या दौऱ्यासाठी उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवरून देखील सपकाळ यांनी आरोप केले आहेत. नेमके काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? आयुष मंत्रालय भारत सरकार व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन तर्फे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यासाठी तब्बल 10 ते 15 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याचा फायदा एकाही शेतकऱ्याला झाला नाही, असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. हेलिपॅडचे कंत्राट निकटवर्तीयालाच हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, या मेळाव्याच्या उद्घाटनासाठी देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येऊन गेल्या. श्री संत गजानन महाराज संस्थान तर्फे एक रुपयाही न घेता 3 हेलिकॉप्टर उतरविण्यासाठीची जागा 2 दिवसांसाठी नि:शुल्क देण्यात आली होती, या जागेवर तब्बल 4 कोटी 10 लाख रुपयांचा निधी खर्च करून हेलिपॅड बनविण्यात आले. राष्ट्रपती निघून गेल्यानंतर आता हे हेलिपॅड उखडण्यात येणार आहे. हे हेलिपॅड बनविण्याचे कंत्राट देखील केंद्रीय आयुष मंत्र्यांच्या निकटवर्तीयालाच देण्यात आल्याचे समजते. 4 कोटी खर्चून उभारलेले हेलिपॅड उखडणार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, हे हेलिपॅड बनविण्याला आमचा विरोध नाही. मात्र हेच हेलिपॅड थोडी दूरदृष्टी दाखवून शेगावातील सरकारी जागेवर तयार करण्यात आले असते, तर या हेलिपॅडचा कायमस्वरुपी उपयोग झाला असता. केवळ 2 दिवसांसाठी सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या 4 कोटी 10 लाख रुपयांच्या शासकीय निधीचा एकप्रकारे चुराडा झाला आहे. याऐवजी थोडे नियोजन केले असते तर संत नगरी शेगाव ला कायमस्वरूपी हेलिपॅड मिळाले असते. मात्र संबंधित मंत्र्यांनी ही संधी घालवली. या संपूर्ण मेळाव्यासाठी एकूण 10 ते 15 कोटींचा खर्च केल्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय आरोग्य शिबीर नियोजनाअभावी फेल या आरोग्य शिबिरापासून शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्यांना कुठलाच फायदा न झाल्याने ही देखील शासकीय पैशांची उघळपट्टी ठरली आहे. या आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय शिबिरामध्ये 70 स्टॉलचे नियोजन करण्यात आले होते. मात्र केवळ 20 ते 25 स्टॉल प्रत्यक्षात लागले आहेत. तसेच शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या शिबिराकडे पाठ फिरवली आहे. परिणामी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे हे राष्ट्रीय आरोग्य शिबीर नियोजनाअभावी सपशेल फेल झाले आहे. सर्वसामान्यांनी पाठ फिरवल्याने जनतेच्या कोट्यवधी रुपयांची नियोजनशून्य उधळपट्टी करून त्याचे लाभार्थी हे केवळ आयुषमंत्री आणि त्यांचे बगलबच्चेच ठरले आहेत हे खेदाने नमूद करावे लागेल, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
