महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या तुमसर तालुक्यातील आष्टी या आदिवासी बहुल गावात १५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेली ‘गरदेव यात्रा’ यंदा मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे. होळीच्या पाळव्याला, म्हणजेच धूलिवंदनच्या दिवशी भरणाऱ्या या ‘वांगेगारी’ यात्रेने संपूर्ण भंडारा जिल्हा भक्तीमय झाला असून, यात्रेनिमित्त राज्याच्या सीमा ओलांडून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होणार आहेत. भंडारा जिल्हा हा तलाव आणि संस्कृतीचा जिल्हा मानला जातो. या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग म्हणजे आष्टी येथील गरदेव यात्रा. सुमारे १५० वर्षांपासून ही परंपरा अविरत सुरू आहे. आदिवासी संस्कृती आणि हिंदू धर्मातील महादेव भक्तीचा हा एक सुंदर संगम येथे पाहायला मिळतो. आष्टीची ही यात्रा ‘मोठी यात्रा’ म्हणून ओळखली जाते, तर कवलेवाडा येथील यात्रेला ‘छोटी यात्रा’ म्हणतात. या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नंदी (बैल). विदर्भातील ग्रामीण भागात महाशिवरात्रीला महादेव दर्शनासाठी जाण्याची मोठी प्रथा आहे. जे भाविक ‘छोटा महादेव’ (चौरागड) किंवा ‘मोठा महादेव’ (पचमढी) येथे दर्शनाला जातात, त्यांना परतीच्या प्रवासात किंवा धूलिवंदनला गरदेवसमोर नतमस्तक व्हावे लागते, अशी धारणा आहे. अनेक शेतकरी आणि भाविक आपल्या कुटुंबासह आणि सजवलेल्या नंदीसह यात्रेत येतात. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर मध्य प्रदेशातील शिवणी, बालाघाट आणि कटंगी भागातूनही हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने येथे हजेरी लावतात.
गरदेव यात्रेचा उत्साह केवळ आष्टीपुरता मर्यादित नसून, संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ही यात्रा दीड दिवसांसाठी भरते. यामध्ये प्रामुख्याने मोहाडी तालुक्यातील करडी, तुमसर तालुक्यातील कवलेवाडा, पालांदूर, पवनी तालुक्यातील नेरला तर लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव असतो. सकाळी सूर्योदयापासूनच गरदेवच्या दर्शनासाठी मैलोन्मैल रांगा लागल्या असतात. प्रशासनाकडून आणि स्थानिक ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याचे तसेच सुरक्षेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. कुटुंबीय नवस फेडण्याची प्रथा पाहुनगावचे सरपंच संदीप कोरे याविषयी बोलताना म्हणाले, आमच्या पूर्वजांपासून ही गरदेवची सेवा सुरू आहे. आष्टीच्या यात्रेत आल्याशिवाय आमची महादेवाची वारी पूर्ण होत नाही. यंदा नंदीला घेऊन आम्ही सर्व कुटुंबीय नवस फेडायला आलो आहोत.
