सुमारे २५ वर्षांपूर्वी अनेक अडचणी, आव्हाने आणि मर्यादा असतानाही आम्ही घोडेगाव येथे कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात हे मार्केट उभे करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. मात्र, येथील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी दिलेल्या भक्कम सहकार्यामुळेच हे मार्केट आज महाराष्ट्रातील प्रमुख आणि अग्रेसर कांदा मार्केटपैकी एक म्हणून नावारूपास आले आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.” हे नवीन ६ गाळे बाजारातील घटकांना अधिक सुविधा देणारे ठरतील, असा विश्वास माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला. नेवासे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप-आवार असलेल्या घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा मार्केटमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या ६ अद्ययावत व्यावसायिक गाळ्यांचा शुभारंभ शुक्रवारी झाला. माजी मंत्री गडाख यांच्या हस्ते गाळ्यांचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन नंदकुमार पाटील, व्हा. चेअरमन नानासाहेब नवथर, नानासाहेब रेपाळे, अशोकराव येळवंडे, बाळासाहेब सोनवणे, राजेंद्र सानप आणि सचिव देवदत्त पालवे यांच्यासह परिसरातील शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाळ्यांच्या उद्घाटनानंतर माजी मंत्री गडाख यांनी घोडेगाव येथील प्रसिद्ध शेळी, मेंढी, म्हैस आणि गाईंच्या पशू बाजाराला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी तेथील शेतकरी, व्यापारी आणि हॉटेल चालकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. येत्या काही दिवसांवर आलेल्या ईदच्या सणामुळे आजच्या पशू बाजारात मोठी आर्थिक उलाढाल पाहायला मिळाली. सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात अत्यंत आकर्षक आणि धष्टपुष्ट बोकड विक्रीसाठी दाखल झाले होते. यातील काही विशेष बोकडांची विक्री चक्क लाखो रुपयांना झाल्याची माहिती समोर आली.