पैशांच्या लालसेपोटी एका 21 वर्षीय विवाहितेची एका महिन्यात एकदा नव्हे तर तब्बल तीनदा विक्री करण्यात आल्याची संतापजनक घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. पीडित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. आष्टी पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह 4 जणांना अटक केली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पीडित विवाहिता लातूर जिल्ह्यातील आहे. तिचे पहिले लग्न 2 वर्षांपूर्वी झाले होते. पण पतीच्या त्रासाला कंटाळून ती सध्या माहेरी राहत होती. याच कालावधीत तिची ओळख पुण्याच्या हडपसर परिसरात राहणाऱ्या महानंदा नामक एका महिलेशी झाली होती. महिलेने पीडितेला दुसरे लग्न लावून देण्याचे आश्वासन देत पुण्याला नेले होते. तिथे तिने तिचे अमर काळभोर नामक व्यक्तीशी जबरदस्तीने लग्न लावून दिले. यासाठी आरोपी महिलेने काळभोर याच्याकडून 5 लाख रुपये घेतले. या लग्नाला 10 दिवस होत नाही तोच संबंधितांनी तिला त्या ठिकाणाहून काढून घेत तिची दुसऱ्या एका व्यक्तीला साडेचार लाख रुपयांत विक्री केली. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. महानंदा व तिच्या सहकाऱ्यांनी तुळजापूर येथील एका महिलेच्या मदतीने गत 4 मार्च रोजी तिचे आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथील एका व्यक्तीशी तिसरे लग्न लावून दिले. या लग्नातही आरोपींनी जवळपास साडेचार लाख रुपयांची रक्कम उकळल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकारामागे लग्नाच्या नावाखाली महिलांची विक्री करणारे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. चौथ्या लग्नाचा दबाव टाकताच फुटले बिंग? पीडित महिलेचे 3 लग्न लावून दिल्यानंतरही आरोपींचे मन भरले नाही. त्यांनी गत 6 मार्च रोजी तिच्यावर चौथ्या लग्नासाठी दबाव टाकला. यामुळे पीडित महिला भविष्यातील अत्याचाराच्या भीतीने प्रचंड मानसिक दबावाखाली आली. अखेर तिने विषारी औषध प्राशन करून स्वतःची जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या तिच्यावर मिरजगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. आष्टी पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिला व तिच्या पतीसह 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे करत आहेत. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. लग्नाच्या आमिषाने महिलांची खरेदी-विक्री करणाऱ्या रॅकेटबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्रामीण भागातील आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना किंवा कौटुंबिक समस्यांमुळे घराबाहेर पडलेल्या महिलांना लक्ष्य करून अशा टोळ्या सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक स्वरूपात केला जात असून आंतरजिल्हा पातळीवरील धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे. विशेषतः या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.