NEET-UG परीक्षेतील कथित गोंधळ अजून शांत होत नाही तोच, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा (NTA) आणखी एक अत्यंत धक्कादायक आणि अजब कारभार समोर आला आहे. नागपूरमधील रहिवासी आणि NEET ची तयारी करणाऱ्या अब्दुल्ला मोहम्मद तालिब या विद्यार्थ्याला 21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी थेट संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) ‘अबुधाबी’ येथील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर नागपूर ते दिल्ली खळबळ उडाली आहे. हॉल तिकीट पाहताच विद्यार्थी ढसाढसा रडला
विद्यार्थ्याचे वडील मोहम्मद तालिब यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “काल दुपारी ४ वाजता जेव्हा आम्ही हॉल तिकीट डाऊनलोड केले, तेव्हा परीक्षा केंद्र म्हणून अबुधाबीमधील एका शाळेचे नाव पाहून आम्हाला मोठा धक्का बसला. आम्ही पर्यायांमध्ये असे कोणतेही केंद्र निवडले नव्हते. हा धक्का सहन न झाल्याने माझा मुलगा काल प्रचंड रडला आणि त्याने परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याच्या आईने त्याची समजूत काढली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, माझ्या मुलाकडे पासपोर्ट देखील नाही, मग तो परदेशात कसा जाणार?” NTA कडून नवीन हॉल तिकीट देण्याचे आश्वासन
या गंभीर गडबडीनंतर कुटुंबाने तातडीने हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधला. त्यांना मेल पाठवण्यास सांगण्यात आले. मेल पाठवल्यानंतर एनटीएकडून फोन आला असून शनिवार (आज) दुपारी ४ वाजेपर्यंत नवीन हॉल तिकीट जारी केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. आता फक्त नागपूर केंद्राचीच मागणी
“आम्ही परीक्षेसाठी ३ जिल्ह्यांचे पर्याय दिले होते, परंतु आता या मानसिक त्रासामुळे आमचा मुलगा प्रचंड तणावाखाली आहे. आता दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्यात जाण्यासाठी आमच्याकडे वेळ उरलेला नाही. त्यामुळे त्याला नागपूरमध्येच परीक्षा केंद्र देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे,” असे हताश वडिलांनी सांगितले. या प्रकरणावरून आता NEET परीक्षेच्या नियोजनावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. NEET च्या ‘अबुधाबी’ घोळावरून नाना पटोलेंचा भाजप सरकारवर ‘महापाप’ केल्याचा आरोप या अजब कारभारावर आता काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारवर थेट हल्लाबोल करत म्हटले आहे की, भाजप सरकार देशातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत आहे. नीट पेपरफुटीनंतर देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले. आता नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट अबुधाबीचे सेंटर दिले जात आहे; हे भाजप सरकारचे महापाप आहे.” केवळ चुका मान्य करून भागणार नाही, तर या भोंगळ कारभाराची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अजून राजीनामा का दिला नाही? असा संतप्त सवाल करत पटोले यांनी केंद्र सरकारचा तीव्र निषेध केला आहे. “नशीब… इराणमध्ये परीक्षा केंद्र मिळालं नाही- रोहित पवार या अजब कारभारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. नागपूरच्या विद्यार्थ्याला NEET परीक्षेसाठी चक्क आबुधाबीचे परीक्षा केंद्र..! काय बोलावं हेच कळत नाही! धन्य ती NTA आणि धन्य ते शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान..! नशीब… इराणमध्ये परीक्षा केंद्र मिळालं नाही..!” पेपरफुटीच्या आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर NTA च्या या भोंगळ कारभारावर आधीच विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष असताना, आता रोहित पवारांच्या या उपरोधिक आणि आक्रमक ट्विटमुळे हा मुद्दा राजकीय वर्तुळात चांगलाच तापला असून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. वाचा संबधित बातमी.. ‘री नीट’साठी आज NTA ची देशभरात मॉकड्रिल: भारतातील 551 शहरांत केंद्रे, 22.79 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी 2 लाख कर्मचारी तैनात NEET-UG 2026 च्या पुनर्परीक्षेपूर्वी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) शनिवारी देशभरात मॉक ड्रिल करेल. परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासन आणि केंद्रीय एजन्सीजसोबत मिळून मल्टी लेयर सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली आहे. 21 जून रोजी होणाऱ्या परीक्षेत 22.79 लाखांहून अधिक उमेदवार सहभागी होतील. यासाठी भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 5000 हून अधिक परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. NTA नुसार, परीक्षा आयोजित करण्यासाठी 2 लाखांहून अधिक कर्मचारी, 674 सिटी कोऑर्डिनेटर आणि 6,669 निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. NTA नुसार, परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 वाजेपर्यंत पेन-अँड-पेपर पद्धतीने होईल. PwD आणि PwBD श्रेणीतील पात्र उमेदवारांना अतिरिक्त वेळ देऊन सायंकाळी 6:20 वाजेपर्यंत परीक्षा लिहिण्याची परवानगी असेल. सविस्तर वाचा
