काम नाही तर नावाला नवनिर्माण कशासाठी?:मनसे पदाधिकाऱ्यांवर राज ठाकरे संतापले; म्हणाले- सगळ्या गोष्टींचा मजाक बनवलाय

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. दहिसर ते वांद्रे या परिसरातील विविध विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. गोरेगाव पश्चिम येथील एम्पायर बँक्वेट हॉलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. महिला विभाग, शाखा तसेच उपशाखा स्तरावरील पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र या बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी काही पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत त्यांना कडक शब्दांत सुनावल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना थेट इशारा दिला. तुम्ही खाली काय करता याची मला पूर्ण माहिती मिळते. कोण काय काम करतंय आणि कोण निष्क्रिय आहे, हे सगळं माझ्यापर्यंत पोहोचत असतं. आता मला प्रत्येकाने नेमकं काय काम केलं हे पाहायचं आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याचे समजते. पक्षाच्या कामकाजात शिथिलता दिसून येत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. सगळ्या गोष्टींचा मजाक बनवला आहे. जर काही नवीन करायचं नसेल, तर पक्षाच्या नावात असलेल्या ‘नवनिर्माण’चा अर्थ तरी काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज ठाकरे यांनी बैठकीत सदस्य नोंदणीच्या कामाचाही आढावा घेतला. पक्षाच्या संघटनात्मक कामात कोण किती सक्रिय आहे, याची आकडेवारी लवकरच समोर येईल, असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच येत्या 19 तारखेला पक्षाच्या पुढील कार्यक्रमासाठी तयारी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवावा आणि पक्षाच्या कामात अधिक सक्रिय व्हावे, असे निर्देशही त्यांनी दिल्याचे समजते. या बैठकीत महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही राज ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. तुम्ही फक्त हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करता, पण महिलांसाठी त्यापलीकडे कोणते नवे उपक्रम राबवता? असा थेट सवाल त्यांनी केल्याची माहिती आहे. महिलांसाठी समाजाभिमुख उपक्रम राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. पक्षाचे काम केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता समाजात सक्रिय भूमिका घ्यावी, असे त्यांनी सुचवले. कामात ढिलाई सहन केली जाणार नाही दरम्यान, बैठकीनंतर मनसेच्या संघटनात्मक हालचालींना वेग देण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, पक्षाच्या कामात ढिलाई सहन केली जाणार नाही. पुढील काळात संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना ठोस जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता आहे. आगामी कार्यक्रम आणि संघटन विस्ताराच्या दृष्टीने मनसे आता अधिक सक्रिय होण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!