श्रीरामपूर म्हणजे बिनवेशीचे गाव…” शहराबद्दल नेहमीच व्यक्त केले जाणारे हे नकारात्मक मत आता कायमचे इतिहासजमा होणार आहे. तत्कालीन आमदार दिवंगत जयंत ससाणे यांनी श्रीरामपूरची ही ओळख पुसण्यासाठी बेलापूर-श्रीरामपूर हद्दीवर वेस उभारण्याचा पुढाकार घेतला होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षे हे काम रखडल्याने नागरिकांमधून खंत व्यक्त होत होती. आता अखेर हे काम पूर्णत्वाकडे जात असून, श्रीरामपूरची नवी ओळख ‘वेशीचे गाव’ म्हणून होणार आहे. शहराच्या निर्मितीच्या इतिहासात डोकावल्यास, पूर्वी बेलापूर हे मुख्य गाव होते. रेल्वे स्थानकाला आजही ‘बेलापूर’ असंच नाव आहे. श्रीरामपूरची स्थापना नंतरच्या काळात झाल्याने शहराला वेशी नव्हत्या. यामुळे शहरात काही अप्रिय घडले की, ‘बिनवेशीचे गाव’ म्हणून कळत-नकळत बदनामी केली जायची. ही डागाळलेली प्रतिमा पुसण्यासाठी स्व. ससाणे व त्यांच्या मित्रमंडळाने बेलापूर हद्दीवर वेस उभारली. एवढेच नव्हे तर संगमनेर, नेवासे आणि पुणतांबा रस्त्यावरही अशीच प्रवेशद्वारे उभारण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र स्व. ससाणे यांच्या निधनानंतर या अर्धवट वेशीकडे दुर्लक्ष झाले. आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, सन्मित्र मंडळ आणि माजी स्व. जयंतराव ससाणे मित्रमंडळाने यासाठी पुढाकार घेतला. १९ मार्च २०२६ रोजी या वेशीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. ते आता अंतिम टप्प्यात आहे. ‘दिव्य मराठी’च्या पाठपुराव्याला यश श्रीरामपूरच्या या प्रश्नाकडे ‘दिव्य मराठी’ने सातत्याने लक्ष वेधले होते. ५ जून २०२३ च्या अंकात ‘श्रीरामपूरमध्ये उभारलेली वेस पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे कान टोचले होते. ‘दिव्य मराठी’च्या या वृत्तानंतर तीन वर्षांनी या कामाला मुहूर्त मिळाला . ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केलेले वृत्त. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नामकरण या ऐतिहासिक वेशीला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ असे नाव देण्यात येईल, अशी घोषणा आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली होती. त्याप्रमाणे या प्रवेशद्वाराचे नामकरण करण्यात आले असून, काम पूर्ण होताच याचे अधिकृत आणि लोकार्पण केले जाणार आहे.
