मागील काही दिवसांपासून सातत्याने आदिवासी तसेच पर्यटकांना हरिसालच्या जंगलात वाघाचे दर्शन होत असून नियमितपणे त्यांच्या डरकाळ्या ऐकू येत आहेत. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. पावसाळा सुरू झाला की, येथील पर्यटन बहरते. कारण सृष्टी नव्या नवरीप्रमाणे नटते. अशातच जर वाघ दिसत असतील, तर पर्यटकांच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे. स्थानिकांनाही यामुळे निश्चितच लाभ होणार आहे. मेळघाट म्हटले की, डोळ्यासमोर उभे राहते ते अथांग हिरवे जंगल, देखणे सृष्टीसौंदर्य, डोंगर-दऱ्यांमधून वाहणारा वारा, पक्ष्यांचा मधूर आवाज आणि वन्यजीवांच्या मुक्त संचाराने भरलेला निसर्ग. त्यातही या सर्वांवर राज्य करणारा वाघ. गेली कित्येक वर्षे या जंगलाने अनेक चढ-उतार पाहिले. कधी जंगलावर संकटाचे सावट आले. कधी वन्यजीवांच्या अधिवासाबाबत चिंता निर्माण झाली. मात्र, आता पुन्हा एकदा मेळघाटच्या जंगलाने आपले वैभव परत मिळवण्यास सुरुवात केली आहे. हरिसाल वनपरिक्षेत्रातील इको टुरिझम क्षेत्रात आता वाघाचे राजेशाही थाटात वावरणे दिसत आहे. अधिवासही निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उर्वरित,पान.४ वाघाची डरकाळी ही केवळ एका प्राण्याच्या अस्तित्वाची खूण नाही, तर संपूर्ण जंगल पुन्हा जिवंत झाल्याचा संदेश आहे.मेळघाटच्या मातीत, झाडांमध्ये आणि या जंगलावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आज एकच भावना आहे. “जंगल वाचले तर निसर्ग वाचेल, आणि निसर्ग वाचला तर मेळघाटचे भविष्य उज्ज्वल राहील.”हरिसालच्या जंगलाला चांगले दिवस आले.
