राऊतांनी भाजपचा एक कार्यकर्ता तरी फोडून दाखवावा:भाजपचे तुकडे करण्याची भाषा हास्यास्पद, राऊतांचा पक्ष औरंगजेबाच्या चरणावर अर्पण- नवनाथ बन

संजय राऊत यांनी भाजपचा एक कार्यकर्ता तरी फोडून दाखवावा. रोज कार्यकर्ते, नगरसेवक आणि पदाधिकारी उबाठा गट सोडत असताना भाजपचे तुकडे करण्याची भाषा हास्यास्पद आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. तर प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपवून त्यांना काँग्रेसमध्ये विलीन करण्याची काँग्रेसची जुनी भूमिका आहे. संजय राऊत हेही त्याच अजेंड्यावर काम करत असून महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा काँग्रेसचे राजकारण त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते असेही त्यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत सातत्याने प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हावेत अशी भूमिका घेत आहेत. उद्या उबाठा गटाचेही काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव ते मांडतील. या भूमिकेला विरोध करणारे नेते आणि खासदार पक्ष सोडत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र सर्व दबावानंतरही भाजपचा एकही कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नाही.

राऊतांनी औरंगजेबांचा इतिहास सांगावा नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगण्यापेक्षा ते ज्या औरंगजेबाच्या वैचारिक वारशावर चालत आहेत ते सांगितले पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा स्वाभिमानाचा आणि हिंदुत्वाचा आहे. पण राऊतांचा पक्ष हा औरंगजेबाच्या चरणावर अर्पण केला आहे. औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणं आणि त्याच्या विचारांचा उदोउदो करण्याचे काम उबाठा आणि संजय राऊत करत असतात. त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार उरलेला नाही. राऊतांनी 2019 मध्ये पक्ष कितीत विकला? नवनाथ बन म्हणाले की, उबाठाकडून 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी शिवसेना, हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा काँग्रेसच्या दारात गहाण ठेवले. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी सर्व काही त्यावेळी बाजारात विकले. ज्यांनी स्वतः पक्षाचा राजकीय लिलाव केला त्यांनी इतरांवर आरोप करण्याआधी पक्ष किती कोटीमध्ये विकला याचे महाराष्ट्राला उत्तर द्यावे. बाळासाहेबांच्या नावाचा राजकीय वापर थांबवा नवनाथ बन म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार जपणारी शिवसेना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आहे. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या उबाठा गटाला मूळ शिवसेना म्हणण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राच्या जनतेने मतांद्वारे खऱ्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केले आहे. उबाठा गटाचा आज वर्धापन दिन नाही, आज केवळ मुळ शिवसेनाचा वर्धापन दिन आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. सोनिया गांधींवर कठोर टीका करणारे बाळासाहेब आणि आज काँग्रेससोबत सत्तेसाठी जाणारे नेते यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या नावाचा राजकीय वापर थांबवावा.

Leave a Comment

error: Content is protected !!