गॅस – पेट्रोल तुटवडाही नेहरूंमुळेच झाला:विजय वडेट्टीवार यांचा भाजपला खोचक टोला; जनतेच्या संयमाचा अंत न पाहण्याचा इशारा

राज्यातील जनता गॅस सिलिंडरसाठी तासनतास रांगेत उभी आहे. हायवेवरील हॉटेल्स बंद पडली आहेत. काँग्रेस कार्यालयाबाहेरील हॉटेल्सही ओस पडली आहेत. पण सत्ताधाऱ्यांची बनवाबनवी अजूनही सुरूच आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधताना केली. सध्याची इंधन टंचाई पंडित जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधींमुळेच झाली असेल, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी भाजपला हाणला. इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्धामुळे सध्या भारताला होणारा इंधन पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे देशात सर्वत्र इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक शहरांत गॅस एजन्सीपुढे नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्याचे दिसून येत आहेत. त्यातच भाजपने या स्थितीसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जबाबदार धरल्यामुळे काँग्रेसचे पित्त खवळले आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी वरील टीका केली आहे. ते म्हणाले, हा गॅस – पेट्रोल तुडवडा पंडित नेहरूंमुळेच झाला असेल! गॅस सिलेंडरसाठी जनता तासन् तास रांगेत उभी आहे, हायवेवरची हॉटेलं बंद पडली आहेत, काँग्रेस कार्यालय बाहेरील हॉटेल बंद आहेत पण सत्ताधाऱ्यांची ‘बनवाबनवी’ अजूनही सुरूच आहे! स्वतःच्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडताना भाजपला लाज वाटत नाही..पाप तुमचं आणि खापर काँग्रेसवर? राहुल गांधीचे नाव भाजपला घ्यायचे नसेल हा तुटवडा पण पंडित नेहरू, इंदिराजी गांधी यांच्यामुळेच झाला,भाजपची ही जुनी टेप आहे. लोकांच्या चुली विझवून कसले नवीन जुमले देत आहेत?जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका, उत्तरे द्या, असे वडेट्टीवार म्हणाले. महाराष्ट्राचा मंत्री शहीद झाला असता विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सातारा जिल्ह्यात मंत्री शंभूराज देसाई व पोलिसांत झालेल्या कथित झटापटीवरही भाष्य केले. या घटनेला त्यांनी थेटपणे भाजपला जबाबदार धरले. ते म्हणाले, राज्याचे गृहखातं झोपलंय की जाणीवपूर्वक डोळेझाक करतंय? साताऱ्यात मंत्र्यावर हल्ला झाला. तेव्हा सीसीटीव्ही बंद होते. हा पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न आहे. हा पूर्वनियोजित कट नाही तर काय? हे राज्य सुरक्षित आहे का? मंत्र्यावर हल्ला होतो, सीसीटीव्ही बंद असतात, पुरावे नष्ट केले जातात. हे सर्व कोणाच्या इशाऱ्यावर घडतंय? जनतेला उत्तर हवंय. हे घडवायचे होते म्हणून तिथे पीओपीचे काम काढले. आणि पीओपीचे काम काढले म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले. ही वस्तुस्थिती आहे. ते अर्धवट सांगत आहेत. ते पुरावे सापडू नये म्हणून प्रयत्न करत आहेत. तो मंत्री (शंभूराज देसाई) अगोदरच फार बारीक किरकोळ आहे. त्याला थोडे बसले. अधिक बसले असते तर महाराष्ट्राचा मंत्री शहीद झाला असता, असे वडेट्टीवार म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!