सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव – कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या शैक्षणिक सहलीत इतिहास, संस्कृती आणि निसर्गाचा अनोखा संगम अनुभवत देशभक्तीची प्रेरणा घेतली. दि. २२ मार्च २०२६ ते ३० मार्च २०२६ दरम्यान आयोजित या सहलीत ५२ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
या सहलीचे प्रमुख आकर्षण ठरले अमृतसर येथील जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक. १३ एप्रिल १९१९ रोजी इंग्रजांनी निःशस्त्र भारतीयांवर केलेल्या क्रूर गोळीबाराच्या खुणा पाहताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू तर हृदयात देशप्रेमाची ज्वाला पेटली. शेकडो शहीदांच्या बलिदानाने भारलेले हे स्थळ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.
यानंतर सुवर्ण मंदिरातील शांतता आणि अध्यात्मिक वातावरण अनुभवत विद्यार्थ्यांनी भारत-पाक सीमेवरील वाघा बॉर्डरवरील ‘Beating Retreat Ceremony’चा थरार अनुभवला. देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमलेले वातावरण विद्यार्थ्यांना रोमांचित करून गेले.

सहलीदरम्यान डलहौजी येथील वन्यजीव अभयारण्य, ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून प्रसिद्ध असलेले खज्जीयार, तसेच धर्मशाला येथील हिमाचल क्रिकेट असोसिएशनचे मैदान आणि दलाई लामा मठ यांना भेट देत विद्यार्थ्यांनी तिबेटियन संस्कृती, स्थानिक लोकजीवन, लोककला आणि आर्थिक क्रियांची माहिती घेतली. निसर्ग, शेती व वन्यजीव परिसंस्थेचा अभ्यासही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून केला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल आयोजित करण्यात आली. डॉ. गजानन सोडनर, डॉ. प्रवीण कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब देशमुख, डॉ. संतोष गायकवाड, डॉ. माधुरी तानुरकर, डॉ. विभा घोडखांदे आणि डॉ. शैलेश आत्राम यांनी सहलीचे नियोजन व अंमलबजावणी यशस्वीरीत्या पार पाडली.

सहलीसाठी परवानगी दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्राचार्य डॉ. घरडे यांचे आभार मानले. तसेच सहल यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही मोलाचे योगदान लाभले.
एकूणच, या सहलीने विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव, संस्कृतीचे भान आणि देशप्रेमाची प्रेरणा देत एक अविस्मरणीय अनुभव दिला.
