संजय राऊतांना पराभव दिसू लागल्याने बिनबुडाचे आरोप:उमेदवारांना धमकावल्याच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचा पलटवार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या गोंधळावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर उमेदवारांना धमकावल्याचा आरोप केल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. “ज्यांना वेळेत उमेदवारी अर्ज भरता आले नाहीत, त्यांनी आपल्या नियोजनातील त्रुटी मान्य कराव्यात, बिनबुडाचे आरोप करू नयेत,” असा टोला नार्वेकर यांनी लगावला. कुलाबा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजीवर राहुल नार्वेकर यांनी पडदा टाकला आहे. “कुठल्याच वॉर्डात आता बंडखोरीचा विषय उरलेला नाही. जे कार्यकर्ते नाराज होते, त्यांच्याशी आम्ही सकारात्मक चर्चा केली आहे. ज्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले होते, त्यांनी ते मागे घेतले आहेत. त्यामुळे आता कुलाबा विधानसभेत भाजपात अंतर्गत कुठल्याही प्रकारची नाराजी किंवा बंडखोरी उरलेली नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. उमेदवारांना धमकावल्याच्या आरोपावर उत्तर कुलाबा मतदारसंघात उमेदवारांना धमकावल्याच्या आरोपांवर बोलताना, हे आरोप नाहीत, हे सत्य असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. यावरही उत्तर देताना नार्वेकर म्हणाले, “मला संजय राऊत आणि ठाकरे गटाकडून अशीच अपेक्षा होती. जेव्हा आपला पराजय आपल्याला स्पष्टपणे दिसतो, त्यावेळी अशाप्रकारचे बिनबुडाचे आरोप करून, स्वत:च्या पराजयाचे कारण शोधायचा प्रयत्न करत असतात. त्यातीलच हा एक प्रकार आहे. संजय राऊतांना त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे, असे बिनबुडाचे आरोप करत असतात,” असे प्रत्युत्तर राहुल नार्वेकर यांनी दिले. भाजपच्या काही उमेदवारांना अर्ज भरता आला नाही राहुल नार्वेकर म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी उमेदवारांना धमक्या दिल्या, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिले नाहीत, असे वारंवार सांगण्यात येते. मात्र, त्या निवडणूक कार्यालयात पाच वाजेनंतर आतमध्ये असणाऱ्या सगळ्यांना घेतले गेले. जे वेळेत आले नाही, त्यांना बाहेर ठेवण्यात आले. त्यात भाजपच्या काही उमेदवारांना आपला अर्ज भरता आला नाही. वॉर्ड क्रमांक २१२ च्या भाजपच्या उमेदवारांना फॉर्म भरता आला नाही. त्यामुळे मी स्वत: पक्षाचे फॉर्म भरण्यापासून कुणाला थांबवणार आहे का? हा कायदा सर्वांसाठी समान आहे. ज्यांना रडीचा डाव खेळण्याची सवय आहे, ते अशाप्रकारची कारणे सादर करत असतात, असा पलटवार राहुल नार्वेकर यांनी संजय राऊतांच्या आरोपांवर केला. विरोधकांनी उमेदवारांबरोबर चुकीची भूमिका घेतली ज्यांच्याकडे शेवटपर्यंत उमेदवार नव्हते. ज्यांनी दुपारी एक आणि दोन वाजता उमेदवारांना एबी फॉर्म दिला, ते पाच वाजेच्या आत येऊन कसे अर्ज दाखल करणार? तुम्ही रात्री दोन वाजता लोकांना एबी फॉर्म देतात आणि सकाळी जाऊन अर्ज भरण्यास सांगतात, यात चूक तुमची आहे. तुम्ही तुमच्या कार्यकर्ते आणि उमेदवारांबरोबर चुकीची भूमिका घेतलेली आहे. तुम्ही वेळेत उमेदवारी दिली असती, तर त्यांना वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता आला असता, अशी टीकाही राहुल नार्वेकर यांनी केली. राऊतांनी जबाबदार नागरिकाची शिकवणूक घ्यावी राहुल नार्वेकर हे विसरले आहेत की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत. अध्यक्षपदाला काही नियम आणि संकेत असतात. राजकीय कार्यक्रमांपासून त्यांनी अलिप्त राहायला हवं, असे संजय राऊत म्हणाले होते. यावर बोलताना नार्वेकर म्हणाले, मी ज्यावेळी विधानसभेत अध्यक्ष म्हणून माझी भूमिका बजावत असतो, तेव्हा मी संपूर्णपणे विधानसभा अध्यक्ष म्हणूनच माझे काम करत असतो. मी माझ्या मतदारसंघात काम करत असताना, त्यावेळी माझ्या मतदारसंघाचा आमदार म्हणून, जनतेला न्याय द्यायचे काम करत असतो. त्यामुळे संजय राऊतांनी मला माझी जबाबदारी शिकवू नये. त्यांनी आधी जबाबदार नागरिक कसा असावा, याची शिकवणूक घ्यावी आणि मग बोलावे, असा टोला संजय राऊतांना लगावला.

Leave a Comment

error: Content is protected !!