भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भोंदू अशोक खरातची भेट घेतल्याचा पुनरुच्चार केला आहे. नीलम गोऱ्हे यांनी अनेकदा भोंदू अशोक खरातची भेट घेतली. या भेटीवेळी उपस्थित असलेल्या लोकांनीच मला माहिती दिली होती. याचे पुरावे योग्य वेळी व योग्य ठिकाणी सादर केले जातील, असे त्या म्हणाल्यात. दरम्यान, रुपाली चाकणकरांनी स्वतःहून एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे, असेही त्या म्हणाल्यात. तृप्ती देसाई यांनी काही दिवसांपूर्वी नीलम गोऱ्हे यांनी अशोक खरातची भेट घेतल्याचा आरोप केला होता. पण गोऱ्हे यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे हे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर आज तृप्ती देसाई यांनी आपण आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, नीलम गोऱ्हेंची माहिती पूर्णतः खरी आहे. गोऱ्हे यांनी अशोक खरातच्या ऑफिसमध्ये त्याची भेट घेतली होती. या भेटीवेळी उपस्थित असलेल्या लोकांनी मला ही माहिती दिली आहे. त्यामुळे ही गोष्ट एखाद्या त्रयस्त व्यक्तीने दिलेली नाही. ज्या काही गोष्टी आहेत व साक्षीदार आहेत ते योग्य वेळी समोर येऊन बोलतील. शिवसेनेच्या लोकांनीच दिली नीलम गोऱ्हेंची माहिती तृप्ती देसाईंनी यावेळी सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच आपल्याला ही माहिती दिल्याचेही आवर्जुन स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, मला माहिती देणारी एक व्यक्ती नाशिक, तर दुसरी पुण्याची आहे. त्यांनी तूर्त मला हे प्रकरण एसआयटी व त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जात नाही, तोपर्यंत आमचे नाव घेऊ नका असे सांगितले आहे. कारण, त्यांच्या कुटुंबीयांवर दबाव आणला जाऊ शकतो. त्यांचे स्टेटमेंट बदलण्यासाठी त्रास दिला जाऊ शकतो. पण जेव्हा केव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते लोक स्वतः समोर येतील किंवा मी त्याचे पुरावे समोर आणेल. हे लोक शिवसेनेत फार मोठे पदाधिकारी आहेत किंवा नाही हे मी आत्ता सांगणार नाही. पण त्यांची विश्वासार्हता चांगली आहे. ते योग्यवेळी मीडिया, एसआयटी व एकनाथ शिंदेंपुढे नीलम खरात व अशोक खरातच्या भेटीची माहिती देतील. शिंदे सेनेच्या लोकांकडून या प्रकरणात माझा वापर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांच्याकडे अनेक नेते व प्रवक्ते आहेत. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाच्या लोकांनी मला पुरावे दिल्याचा आरोप केला. पण ते मोठ-मोठे लोक आमच्याकडे कशाला येतील? त्यांनी त्यांच्या त्यांच्या विरोधी पक्षांना व प्रवक्त्यांना सांगितले असतील. पण यातील माहिती पूर्णपणे खरी आहे, त्याचे पुरावे योग्यवेळी योग्य ठिकाणी सादर केले जातील, असे त्या म्हणाल्या. अशोक खरातने काळे पैसे पांढरे केले तृप्ती देसाई यांनी यावेळी अशोक खरात नॉमिनी असणाऱ्या 100 हून अधिक बँक खात्यांवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, सध्या अशोक खरातच्या बाबतीत दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. आता नागरी पतसंस्थेत 100 हून अधिक बोगस खाते उघडण्यात आली. त्यात अशोक खरात स्वतः नॉमिनी आहे. यावरून काही जणांनी त्याचा काळा पैसा पांढरा करण्याचे काम केल्याचे स्पष्ट होते. आता हे प्रकरण पुढे आल्यानंतर रुपाली चाकणकरांच्या भगिणी असतील, त्यांचे नातेवाईक किंवा इतर कुणी असतील. त्यांची चौकशी एसआयटी करेल. जे काही सत्य असेल ते समोर येईल. पेनड्राईव्ह कुठे अडकले? त्या म्हणाल्या, 2025 मध्ये श्रीरामपूरच्या एका वृत्तपत्राने बातमी दिली. त्यानंतर महिला आयोगाने त्यावर दबाव टाकला. त्या वृत्तपत्राच्या संपादकाने फोन करून मला या प्रकरणाची माहिती दिली होती. त्यांनी मला या प्रकरणातील पेनड्राईव्ह आल्यानंतर ते देण्याचे सांगितले होते. परंतु या प्रकरणी बातमी आल्यानंतर खरात अलर्ट झाला. यामुळे जे लोक पेनड्राईव्ह घेऊन येणार होते, त्या संपादकाला देणार होते ते आलेच नाहीत. यामुळे ते संपादकही माझ्याकडे आले नाही. त्यानंतर आम्ही या प्रकरणाचा फॉलोअप घेतला असता आम्हाला असा निरोप आला की, नोव्हेंबर – डिसेंबरच्या दरम्यान पेनड्राईव्ह मिळतील. पण त्याचवेळी पोलिस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे पेनड्राईव्ह देणाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला व ते पेनड्राईव्ह गायब करण्यात आले. चाकणकरांनी स्वतः चौकशीला सामोरे जावे तृप्ती देसाई यांनी यावेळी रुपाली चाकणकरांना स्वतःहून एसआयटी चौकशीला सामोरे जाण्याचेही आवाहन केले. रुपाली चाकणकर यांनी आपल्याला कोणताही समन्स मिळाला नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधकांनी पेरलेल्या बातम्या दुर्दैवी आहेत. पण त्यांना निश्चितच समन्स मिळेल. त्यांची चौकशी होईल. त्यांनी स्वतः तातडीने या प्रकरणाच्या चौकशीला सामोरे जावे अशी माझी मागणी आहे, असे त्या म्हणाल्या.
