Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

उद्धव ठाकरेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा:NCP प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंशीही साधणार संवाद

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या पक्षाने यापूर्वीच बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरेंही आपला उमेदवार देणार नाहीत. आता आम्ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशीही संवाद साधून त्यांनाही ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती करणार आहोत, असे तटकरे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वाढली आहे. बारामती विधानसभेची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे रिक्त झाली आहे. या ठिकाणी 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उद्या सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरतील. सुनेत्रा पवार यांनी शनिवारीच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा करून निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्यानंतर ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ठाकरे या निवडणुकीत आपला उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, खरगेंशीही बोलणार सुनील तटकरे आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत. विशेषतः महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या पक्षाने उमेदवार देणार नाही असे यापूर्वीच घोषित केले आहे. आम्ही या प्रकरणी शरद पवार व सुप्रिया सुळेंचे आभारही मानलेत. उद्धव ठाकरे यांच्याशीही आमची चर्चा झाली. ते सुद्धा आपला उमेदवार देणार नाहीत. आता आम्ही काँग्रेसशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी आज आमचे बोलणे होईल. त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत. ज्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होणार आहे, ती महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक संवेदनशील बाब आहे. अजित पवारांनी गेली 40 वर्षे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्राच्या राजकारणावर एक वेगळा ठसा उमटवला होता. त्यांनी महाराष्ट्राला गतिमान केले. विकासाभिमुख केले. सर्वसामान्य जनतेचा आवाज सातत्याने उंचावण्याचे काम केले. अशावेळी ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची सर्वांचीच नम्रतेची विनंती आहे, असे तटकरे म्हणाले. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यावेळी शरद पवारांना उपस्थित राहण्याची विनंती केली जाणार असल्याचेही सांगितले. जय पवारांची मागणी राष्ट्रवादीचीच उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांनी शनिवारी अजित पवारांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांच्या अटकेची मागणी केली होती. सुनील तटकरे यांनी त्यांच्या या मागणीवरही भाष्य केले. ते म्हणाले, जय पवार यांची जी मागणी आहे, तीच राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. तपास शीघ्र गतीने झाला पाहिजे. तपासाच्या बाबतीत ज्या – ज्या शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत, त्याचाही तपासात समावेश करण्यात यावा. अनेक लोकप्रतिधिनिधींनीही या अपघाताविषयी शंका उपस्थित केल्या आहेत. त्यासह तपास पूर्ण करण्यात यावा. या प्रकरणाचा अंतिम अहवाल लवकरात लवकर यावा. हा अहवाल देशाच्या व राज्याच्या जनतेपुढे यावा. मी स्वतः संसदेत जातो, तेव्हा दादांच्या निधनावर अनेकजण हळहळ व्यक्त करतात. जय पवार एक तरुण नेते आहेत. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करणे योग्य आहे. त्यांच्या भावना कार्यकर्ते व पक्ष संघटनेसाठी योग्यच आहेत, असे तटकरे म्हणाले. भोंदू खरातला फाशीची शिक्षा द्या सुनील तटकरे यांनी यावेळी भोंदू अशोक खरातला फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी केली. ते म्हणाले, भोंदू अशोक खरातला फाशी दिली पाहिजे. खरात असो किंवा इतर कुणीही असो विकृत मनोवृत्तीच्या लोकांना ठेचून फाशीची शिक्षा द्यावी. हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे. विशेषतः सरकारने एसआयटीच्या माध्यमातून भोंदू खरात प्रकरणाची सखोल चौकशी करावी. ज्यांचा – ज्यांचा या प्रकरणाशी संबंध आला त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे ते म्हणाले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!