‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचा दावा:शिंदेंचा 6 खासदारांशी कॉन्फरन्स कॉल? ओमराजे-संजय दिना पाटीलही चर्चेत सहभागी असल्याची माहिती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणात नवी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीच्या चर्चेत असलेल्या सहा खासदारांशी उशिरा रात्री कॉन्फरन्स कॉलद्वारे संवाद साधल्याची माहिती शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांकडून समोर येत आहे. विशेष म्हणजे, या चर्चेत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचाही सहभाग असल्याचा दावा केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे 30 मिनिटे चाललेल्या या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारांशी सविस्तर संवाद साधला. “ऑपरेशन टायगर यशस्वीपणे पार पडले असून शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील,” असे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवस शांतता राखण्याचा निर्णय? शिंदे गटातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण ऑपरेशन अत्यंत गुप्तपणे आणि कायदेशीर बाबी लक्षात घेऊन राबवण्यात आले आहे. त्यामुळे लगेच कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पुरावे सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून कोणते कायदेशीर डावपेच खेळले जातात, याचा अभ्यास करूनच पुढील पाऊल टाकले जाईल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस अधिकृतरित्या कोणतीही मोठी घोषणा होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, स्वतंत्र गटाला मान्यता मिळाल्यानंतर हा गट अखेर शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. श्रीकांत शिंदेंकडे ऑपरेशनची सूत्रे? दिल्लीतील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगितले जाते. ऑपरेशन टायगरच्या प्रत्येक टप्प्याचे समन्वयन दिल्लीतूनच होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरेंची मनधरणी मोहीम सुरू दुसरीकडे, संभाव्य बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पक्षातील वरिष्ठ नेते विविध खासदारांशी संपर्क साधून त्यांची मनधरणी करत असल्याची माहिती मिळत आहे. मराठवाड्यातील खासदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतल्याचे सांगितले जाते. तर संजय दिना पाटील यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आमदार सचिन अहिर आणि माजी आमदार रमेश कोरगावकर प्रयत्नशील असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. या सर्व संपर्क मोहिमेची माहिती थेट उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली जात असल्याचेही सांगितले जात आहे. संसदीय बैठकीकडे लक्ष दरम्यान, ठाकरे गटाने सर्व खासदारांना संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी व्हीप जारी केला आहे. ही बैठक बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, शिंदे गटातील सूत्रांच्या दाव्यानुसार, कथित बंडखोर सहा खासदार या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता अत्यल्प आहे. कोण आहेत चर्चेतील सहा खासदार? सूत्रांच्या माहितीनुसार खालील खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे: पुढील 48 तास निर्णायक ठाकरे गटाचा व्हीप, लोकसभा अध्यक्षांकडे दिलेले पत्र, स्वतंत्र गटाच्या मान्यतेबाबतचे दावे आणि शिंदे गटाची रणनीती या सर्व घडामोडींमुळे पुढील 48 तास महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक मानले जात आहेत. विशेषतः ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांची अंतिम भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!