सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव : तालुक्यातील पंचायत समिती मारेगाव अंतर्गत येणाऱ्या कानडा (पार्डी) गावाने ग्रामजागृतीचा आदर्श घालून देत ग्राम जयंती सप्ताह उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला. विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या मालिकेतून ग्रामविकासाचा ठोस संदेश देण्यात आला. या सप्ताहाचा समारोप दि. ३० एप्रिल २०२६ रोजी नूतन वाचनालयाच्या दिमाखदार उद्घाटनाने झाला.

सरपंच सौ. सुषमा रूपेश ढोके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका सेवाधिकारी सुनिल देऊळकर यांनी उद्घाटक म्हणून उपस्थित राहून ज्ञानवृद्धीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. “वाचनालय ही केवळ पुस्तके ठेवण्याची जागा नसून, गावाच्या प्रगतीचा पाया आहे,” असे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या ‘ग्राम जयंती’ सप्ताहात दि. २४ एप्रिलपासून सामुदायिक प्रार्थनेने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्वच्छता अभियान, शासकीय व निमशासकीय योजनांची माहिती, शेती मार्गदर्शन, लोकसेवा हक्क, महिला सक्षमीकरण, वृक्षसंवर्धन व व्यसनमुक्ती यांसारख्या विषयांवर प्रभावी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमात कृषी व उद्योग क्षेत्रातील संधींबाबत विकास झीने यांनी मार्गदर्शन केले, तर आशिष लोडे यांनी विषमुक्त शेती व गांडूळ खत निर्मितीचे महत्त्व पटवून दिले. तसेच यवतमाळ बँकेचे प्रतिनिधी टिपू सुलतान देशमुख यांनी विविध अर्थसहाय्य योजना व दुग्धव्यवसायाच्या संधींची माहिती दिली.

या सोहळ्यास माजी सरपंच प्रमोद धोबे, उपसरपंच किशोर मंदे, सदस्य रेखा आस्कर, सदस्य प्रशांत चवले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपेश ढोके यांनी केले, प्रास्ताविक ग्रामसेवक प्रभाकर फूलभोगे यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन सूरज येवले यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान ‘ग्रामगीता’तील ओव्यांमधून ग्रामविकासाचा संदेश देत “गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा” या विचारांनी उपस्थितांना प्रेरित करण्यात आले.ग्राम जयंती सप्ताहाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे कानडा (पार्डी) गावात सामाजिक बांधिलकी, जनजागृती आणि विकासाची नवी ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
