मारेगाव तालुक्यात शेतकऱ्यांची लगबग वाढली; खरीप हंगामाच्या तयारीला वेग
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यात रोहिणी नक्षत्र लागताच शेतकऱ्यांच्या कामांना चांगलाच वेग आला असून संपूर्ण शिवारात खरीप हंगामाच्या तयारीची धामधूम पाहायला मिळत आहे. मृग नक्षत्राच्या आगमनापूर्वीच शेतकरी नांगरणी, वखरणी, बांधबंदिस्ती आणि शेती मशागतीच्या कामात गुंतलेले दिसत आहेत.
पहाटेपासून रात्रीपर्यंत शिवारात ट्रॅक्टरचा आवाज घुमत असून शेतकरी नव्या आशा आणि उमेदीने कामाला लागले आहेत.गेल्या काही वर्षांतील अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि नापिकीच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाला यंदाच्या हंगामाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. “रोहिणीचे वातावरण समाधानकारक असून निसर्गराजा यंदा साथ देईल,” असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.
तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर, भात आदी पिकांसाठी जमीन तयार करण्याची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. कृषी केंद्रांवर बी-बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढत असून शेती अवजारांच्या दुरुस्तीच्या कामांनाही वेग आला आहे.दरम्यान, पावसाचे अनुकूल संकेत मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि नव्या हंगामाची उत्सुकता दिसून येत आहे.
“यंदा निसर्गाने साथ दिली तर बळीराजाचे संकट दूर होईल,” अशी भावना ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे. मारेगाव तालुक्यात सध्या खरीप हंगामाची चाहूल आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीची धडाकेबाज सुरुवात पाहायला मिळत आहे.
