सुरेश पाचभाई | मारेगाव
मारेगाव मे महिन्याच्या सुरुवातीलाच मारेगाव तालुक्यात उन्हाने अक्षरशः आग ओकली होती. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा तब्बल ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक त्रस्त झाले होते. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता, तर उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
अशा असह्य उकाड्यानंतर गुरुवार, दिनांक ७ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास मारेगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये अचानक आलेल्या दमदार पावसाने वातावरणात मोठा बदल घडवून आणला. दुपारपर्यंत कडक उन्हाने हैराण केलेल्या नागरिकांना अचानक काळ्या ढगांनी वेढा घातला आणि काही क्षणांतच जोरदार पावसाने संपूर्ण परिसराला अक्षरशः झोडपून काढले.
या अवकाळी पावसामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी घराबाहेर येत पावसाचा आनंद घेतला. लहान मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला, तर शेतकरी वर्गामध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
मे महिन्याच्या प्रचंड तडाख्यानंतर आलेल्या या पावसामुळे काही काळासाठी का होईना, पण मारेगावकरांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. अचानक बदललेल्या हवामानामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
