राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा रविवारी सकाळी शहरातील चार केंद्रांवर शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. सकाळी ११ ते १२.३० या वेळेत घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी तब्बल 8 हजार 500 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामुळे सकाळपासूनच परीक्षा केंद्र परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. कडक तपासणी करूनच केंद्रात प्रवेश देण्यात आला. पण परीक्षा केंद्रांवर उमेदवारांनी आणलेले साहित्य ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे त्यांना आपल्या बॅगा परीक्षा केंद्राबाहेर उघड्यावर ठेवाव्या लागल्या काही बॅगा झाडांवर अडकवलेल्याही दिसून आल्या. एमआयटी कॉलेज, श्रेयस कॉलेज, चाटे स्कूल आणि एंजल कीड स्कूल या चार केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस विभाग आणि प्रशासनाच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले होते. केंद्र परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उमेदवारांना प्रवेश देण्यापूर्वी कडक तपासणी करण्यात आली. परीक्षेसाठी उमेदवार सकाळी लवकरच केंद्रावर दाखल झाले. केंद्रांबाहेर पालक आणि नातेवाईकांचीही मोठी उपस्थिती दिसून आली. परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली. परीक्षेच्या कामकाजासाठी एकूण एक हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पोलीस विभागाच्या नियमानुसार संपूर्ण परीक्षाप्रक्रिया सुरळीत पार पडली. परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पण उमेदवारांनी आणलेले साहित्य ठेवण्याची कोणतीही तजवीज नव्हती. अनेक उमेदवार बाहेर गावांवरून आले होते. त्यामुळे त्यांच्यापुढे आपल्यासोबतच्या बॅगा कुठे ठेवायच्या हा प्रश्न होता. अखेर त्यांनी परीक्षा केंद्राबाहेर असणाऱ्या झाडांखाली व झाडांवरच अडकवून आपल्या बॅगा ठेवणे पसंत केले. याचे काही फोटो व व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात परीक्षा केंद्रावर ठिकठिकाणी बॅगा पडलेल्या दिसून येत आहे.