प्रतिनिधी | यवतमाळ जिल्ह्यात जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्याला शुक्रवार, दि. १६ मेपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली असून प्रगणक घर सूचीकरण आणि माहिती संकलनाच्या कामासाठी मैदानात उतरणार आहेत. या मोहिमेअंतर्गत १६ मे ते १४ जून या कालावधीत शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक घराची नोंद घेण्यात येणार आहे. जनगणनेच्या प्रारंभीच्या तीन दिवसांत इमारतींची गणना करून त्यानुसार परिसरांचे नकाशे तयार करण्यात येणार आहेत. त्यानंतर एचएलओ ॲपच्या माध्यमातून घरांची व नागरिकांची माहिती डिजिटल पद्धतीने संकलित केली जाणार आहे. शासनाच्या सूचनेनुसार ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित पद्धतीने राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय, यवतमाळ येथे प्रगणक व पर्यवेक्षकांना आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी सर्व पर्यवेक्षकांना मार्गदर्शन करत जनगणना ही राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे सांगितले. माहिती संकलन करताना अचूकता, शिस्त आणि नागरिकांशी समन्वय राखण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कार्यक्रमाला मंडळाधिकारी एकनाथ बिजवे, नितीन खरोडे, जयंत इसाळकर, प्रीतम गोडे यांच्यासह सर्व पर्यवेक्षक उपस्थित होते. जनगणना मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. नागरिकांनीही प्रगणकांना सहकार्य करून खरी व अचूक माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.