अधिक मासाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत शहरातील ऐतिहासिक आणि १२५ वर्षांची परंपरा लाभलेल्या गोरक्षण संस्थानात गोपूजन, गोदान व तुलादान सोहळा भक्तिभावाने पार पडला. धार्मिक वातावरणात झालेल्या या सोहळ्यात १३ दाम्पत्यांनी विधीवत गोपूजन करून गोदान केले, तर अनेक गोभक्तांनी तुलादान विधीत सहभागी होत पुण्यसंचय केला. पं. गुरुप्रसाद उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धार्मिक विधी पार पडले. कार्यक्रमाची सांगता ब्राह्मण भोजन, सामूहिक सहभोजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिल अटल होते. यावेळी सचिव किशन सिंघानिया यांनी गोरक्षण संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला, तर राजेंद्र निमोदिया यांनी या विशेष आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. सध्या गोरक्षण संस्थानात सुमारे ३६० गायींचे संगोपन करण्यात येत आहे. त्यांच्या निवास, आरोग्य आणि देखभालीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गोसंवर्धनासोबतच पर्यावरण संरक्षणालाही संस्थेने प्राधान्य दिले असून, विविध उपक्रम राबवले जात आहेत. या धार्मिक व सामाजिक उपक्रमाच्या यशस्वितेसाठी केतन मजेठीया, अरुण पोबारू, घनश्याम बागडी, गणेश गुप्ता, किशोर दोषी, ॲड. अशोक गुप्ता, प्रकाश जाजू, पूनम जाजू, रामजीलाल शर्मा, शुक्ला, बाजोरिया, अनिल गाबडा यांच्यासह संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी विशेष परिश्रम घेतले. काचेच्या बाटलीतून दूध होतोय पुरवठा गोरक्षण संस्थानाने पर्यावरण संरक्षणासाठी एक अभिनव पाऊल उचलले आहे. शहरातील ग्राहकांना दूधपुरवठा आता प्लास्टिक पिशव्यांऐवजी काचेच्या बाटल्यांमधून केला जात आहे. वापरलेल्या बाटल्या दुसऱ्या दिवशी परत घेऊन त्यांचा पुनर्वापर केला जातो. या उपक्रमामुळे प्लास्टिकमुक्त पर्यावरणाला चालना मिळत आहे. पर्यावरणपूरक व्यवस्थापनाचा आदर्श ठरत आहे. गोरक्षण संस्थानात गोदान व तुलादान करताना भाविक, महिला व इतर.
