वाढते तापमान, अनियमित पाऊस आणि भूजल पातळीत होत असलेली घट यामुळे पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत जलसंधारण ही केवळ गरज नसून, भविष्यातील पिढ्यांसाठीची जीवनरेखा आहे, असे प्रतिपादन यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जलसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोप देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष राजन टोंगो होते. प्रमुख अतिथी म्हणून पक्षीतज्ज्ञ डॉ. प्रवीण जोशी, सहाय्यक वनसंरक्षक दादासाहेब तौर, संस्थापक अध्यक्ष बळवंत चिंतावार, उपाध्यक्ष विनोद सहस्रबुद्धे, सचिव पांडुरंग ढुमणे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या मार्गदर्शनात डॉ. नितीन खर्चे यांनी जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करताना विश्वासनगर येथे लोकसहभागातून राबवण्यात आलेल्या यशस्वी उपक्रमांची माहिती दिली. जलसंधारणाच्या माध्यमातून भूजल पातळी वाढवणे, विहिरी व कूपनलिकांमध्ये पाणी टिकवून ठेवणे आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विविध जलसंधारण प्रकल्पांची माहिती दृकश्राव्य माध्यमातून सादर केली. पक्षीतज्ज्ञ डॉ. प्रवीण जोशी यांनी पर्यावरण संतुलनात पक्ष्यांची भूमिका स्पष्ट केली. यवतमाळ जिल्ह्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाचे सहा प्रमुख मार्ग असून, जिल्ह्यातील सुमारे दोन हजार तलावांमध्ये ३४६ पक्षी प्रजातींची नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यावरण संवर्धनासाठी जैवविविधतेचे जतन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सहाय्यक वनसंरक्षक दादासाहेब तौर यांनी वनविभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. बळवंत चिंतावार यांनीही पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात पर्यावरण दिनानिमित्त आयोजित ‘अंगणातील बगीचा’ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत जयश्री मेहंदळे यांनी प्रथम, शरद मन्नेरवार यांनी द्वितीय तर डॉ. रवींद्र दुर्गे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन स्वाती सहस्रबुद्धे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शीला कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चित्रा देशपांडे, दिवाकर तीरमारे, विनोद राजनकर, प्रा. अनिल दुर्गे, प्रकाश दामले, विजय उपलेंचवार, कोषाध्यक्ष कृष्णराव तपके यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकांसह पर्यावरणप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सहा हजार ज्येष्ठ नागरिक मंडळांद्वारे संवर्धन सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रास्ताविकात सचिव पांडुरंग ढुमणे यांनी महाराष्ट्रभर फेस्कॉमच्या माध्यमातून सुमारे सहा हजार ज्येष्ठ नागरिक मंडळांद्वारे पर्यावरण संवर्धनाची चळवळ राबवली जात असल्याची माहिती दिली. पर्यावरण समितीचे प्रमुख ओंकार ढोले यांनी स्पर्धेचा अहवाल सादर केला. डॉ. नितीन खर्चे यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन यशवंत बापू पाटील यांनी केले.
