केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेतून मंजूर ४९ कोटी ८८ लाख रुपयांचा पाणीपुरवठा प्रकल्प अक्षरशः खेळखंडोबा झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या प्रकल्पाचे काम १८ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ३६ महिने उलटूनही काम अर्धवट अवस्थेत आहे. यामुळे नागरिकांचा संताप वाढला आहे. दरम्यान या प्रकल्पातून घाटंजीकरांना मुबलक आणि नियमित पाणी पुरवठा होईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात कामाचा वेग संथ गतीने सुरू असल्याने नियोजन ढिसाळले आहे. त्यामुळे कामात मनमानी होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. केंद्र, राज्य, नगर परिषद या तिन्ही स्तरांवरून निधी उपलब्ध झालेला असतांना कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचे नागरिक सांगतात. पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली शहरातील नव्याने तयार केलेले सिमेंट रस्ते उखडले गेले आहेत. रस्त्यांची पूर्ण चाळण झाली. पावसाळ्यात हेच रस्ते चिखलमय झाल्यास नागरिकांसाठी धोका वाढणार आहे. अनेक ठिकाणी दुचाकीस्वार घसरून अपघात होणे, पादचाऱ्यांना चालणे ही कठीण होणार आहे. गल्लीबोळ बोळातील रस्ते देखील उखडले आहेत. या योजनेच्या माध्यमातून शहरातील शिवाजी चौक. बस स्थानक परिसर. पोलिस स्टेशन चौक. महाराणा प्रताप चौक. गिलानी कॉलेज चौक. या भागांत वारंवार खोदकाम झाले. नागरिकांना रोज हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. गैरसोय वाढली आहे. बस स्थानकावर जाण्यासाठी गिलानी कॉलेज समोरील मार्ग. संत मारोती मंदिराजवळून जाणारा मार्ग. हे दोन प्रमुख पर्याय आहेत. दोन्ही रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या स्थितीचा फटका व्यापाऱ्यांनाही बसला आहे. अनेकांना दिवस दुकाने बंद ठेवावी लागली. यामुळे आर्थिक नुकसान झाले. वारंवार तक्रारी करूनही नगर परिषद प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी आहे. मात्र कंत्राटदाराने ती पार पाडलेली नाही. असे नागरिक सांगतात. त्यामुळे बहुतांश रस्ते आजही खड्डेमय आणि धोकादायक अवस्थेत आहेत. सर्वात मोठा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. संबंधित कंत्राटदाराला कर्णकवच कोणाचे. एवढा विलंब. निकृष्ट काम. तक्रारी. तरी कारवाई का होत नाही. कोणाच्या आश्रयामुळे हात ठेवला जात नाही, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही हालअपेष्टा होत असतील तर जबाबदार कोण याची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी होत आहे. येत्या जून महिन्यापर्यंत काम पूर्ण होईल ^ वाघाडी प्रकल्पापासून तर शहरातील सर्व भागांतून पाईप लाईन टाकतांना नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कामावर कटाक्षाने लक्ष आहे. पण कालावधीत काम पूर्ण न झाल्यामुळे संबंधित कंत्राटदाराने मुदतवाढ मागितली तेव्हा प्रशासनाने एक वर्ष मुदतवाढ दिली आहे. येणाऱ्या जून महिन्यापर्यंत काम पूर्ण होईल. -रॉजर नारनकर, अभियंता, नगर पालिका, घाटंजी. तीन वर्षांत काम पूर्ण होत नाही याचे अश्चर्य वाटते ^गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेलं पाणीपुरवठा योजनेचं काम म्हणजे विकासाच्या नावाखालील सरळसरळ त्रास आहे. रस्ते उकरून ठेवलेत, सुरक्षा उपाय शून्य, आणि अपघात तर रोजचेच झालेत. लघु व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन ही कामं किती दिवस चालणार? तीन वर्षांत काम पूर्ण होत नाही याचे अश्चर्य वाटते. – विनोद सूक्ते, लघु व्यावसायिक, घाटंजी.