पुरुषोत्तम मासानिमित्त अायाेजित भागवत‎कथा सप्ताहाचा उत्साहामध्ये समाराेप‎:सुदामा भक्ती, श्रीकृष्ण तत्त्व आणि परीक्षित मोक्षाच्या प्रसंगातून निरुपण‎

प्रतिनिधी | यवतमाळ पुरुषोत्तम मासानिमित्त माहेश्वरी महिला मंडळ, यवतमाळ यांच्या वतीने आयोजित श्रीमद्भागवत कथा सप्ताहाची अत्यंत भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सप्ताहाच्या अंतिम दिवशी प.पू. बालयोगी विष्णूप्रसाद अरोरा महाराज यांनी श्रीकृष्ण तत्त्व, सुदामा चरित्र, परीक्षित मोक्ष, दत्तात्रयांच्या २४ गुरुंचे जीवनदर्शन आणि भागवताचे आध्यात्मिक महत्त्व यांचे प्रभावी विवेचन करत उपस्थित भाविकांना अध्यात्म, भक्ती आणि जीवनमूल्यांचा संदेश दिला. कथेच्या प्रारंभी महाराजांनी भगवान श्रीकृष्ण हे योगेश्वर असल्याचे सांगत कर्म, प्रेम, भक्ती आणि धर्म यांचा सुंदर समतोल त्यांच्या जीवनातून दिसून येतो, असे स्पष्ट केले. जीवनात तन, मन आणि साधना यांचे संतुलन राखल्यास खरे समाधान आणि आनंद प्राप्त होतो, असा संदेश त्यांनी दिला. श्रीकृष्णांच्या आठ पटराण्यांचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करताना रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवंती, कालिंदी, मित्रवृंदा, नाग्नजिती, भद्रा आणि लक्ष्मणा या भक्तीच्या विविध स्वरूपांचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. दत्तात्रयांच्या २४ गुरुंचा संदर्भ देताना जीवनातील प्रत्येक व्यक्ती, घटना आणि निसर्गातील प्रत्येक घटक हा माणसाचा गुरु असू शकतो, असे त्यांनी सांगितले. सतत शिकण्याची वृत्ती, आत्मचिंतन आणि अनुभवातून ज्ञान मिळविण्याची तयारी हीच आध्यात्मिक प्रगतीची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले. परीक्षित मोक्षाच्या प्रसंगाचे विवेचन करताना भागवत हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवन जगण्याचे शास्त्र असल्याचे त्यांनी सांगितले. भागवत माणसाला स्वतःची ओळख करून देते, जीवनाचा अर्थ समजावते आणि लोक-परलोक दोन्ही सुंदर करण्याची प्रेरणा देते. “कथा संपते, पण भागवताचा संदेश कधीच संपत नाही,” असे भावपूर्ण उद्गार त्यांनी यावेळी काढले. संकल्पाचे महत्त्व स्पष्ट करताना चांगल्या कार्यासाठी पहिले पाऊल उचलणे आणि दृढ श्रद्धेने साधना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भक्ती, नामस्मरण आणि सत्कर्म यांच्या माध्यमातून जीवन समृद्ध होते, असा संदेशही त्यांनी दिला. माहेश्वरी महिला मंडळाची मेहनत; यशस्वी आयोजन संपूर्ण कथा सप्ताहादरम्यान भाविकांनी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने सहभाग घेतला. महाराजांच्या ओजस्वी वाणीने, मधुर भजनांनी आणि अध्यात्मिक विचारांनी कथास्थळ सात दिवस भक्तिरसात न्हाऊन निघाले. समारोपाच्या दिवशी नामस्मरण, आरती आणि भक्तिभावाच्या वातावरणात भाविकांनी कथामृताचा लाभ घेत आत्मिक समाधानाचा अनुभव घेतला. कथा सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी माहेश्वरी महिला मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि सर्व सहकाऱ्यांचे विशेष योगदान लाभले. समारोपप्रसंगी मंडळाच्या वतीने भाविकांचे आभार मानण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!