बातमी ऐका (Marathi Voice Reader)
कोल्हापूर: किरकोळ वादातून दिरानेच वहिणीचा डोक्यात हातोडा घालून खून केला. सरनोबतवाडी परिसरात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या भयंकर घटनेनं कोल्हापूर हादरलं. रुक्मिणी धर्मेंद्र साहनी असे मृत 24 वर्षीय महिलेचे नाव असून ती मूळची उत्तर प्रदेशातील संत कबीरनगरची आहे. याप्रकरणी संशयित दीर श्रीमंधर बसंत साहनी फरार असून त्याच्यावर गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं घडलं काय?
मूळचे उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर येथील साहनी कुटुंब हे उचगाव परिसरात वास्तव्यास आहे. धर्मेंद्रकुमार साहणी हा फरशी फिटिंगचे काम करतो. तर त्याचा भाऊ श्रीमंधर साहनी हा सरनोबतवाडी येथेच अमर महिपती माने यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहतो. सोमवारी सायंकाळी धर्मेंद्रकुमार हा कणेरी मठ परिसरात कामानिमित्त गेला होता. तेव्हा त्यांची पत्नी रुक्मिणी ही कौटुंबिक कामाच्या निमित्ताने दीर श्रीमंधर यांच्या घरी गेली होती.
लग्न झालं, 8 महिन्यात नवरा गेला, सासू अन् दीराचं विधवा सुनेसोबत धक्कादायक कृत्य, कोल्हापुरला हादरवणारी घटना
दीर-भावजयीत किरकोळ वाद आणि…
रुक्मिणी ही दीर श्रीमंधर याच्या घरी गेली असता दोघांत काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात श्रीमंधर याने घराच्या दारातच रुक्मिणी हिच्या डोक्यात हातोड्याने वार केले. यात गंभीर जखमी होऊन रुक्मिणी रक्ताच्या थारोळ्यात पडली. या घटनेनंतर श्रीमंधर याने तिथून पळ काढला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पती धर्मेंद्रकुमार याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पत्नीला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनेची नोंद गांधीनगर पोलिसांत झाली असून अधिक तपास सुरू आहे.