अमरावतीत रोजगार, उद्योग सर्वेक्षणाचा शुभारंभ:विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते ‘मित्रा’ व शासनाचा पुढाकार

अमरावतीसह पश्चिम विदर्भात रोजगार आणि उद्योग विकासासाठी दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांचा शुभारंभ करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते आज, सोमवारी या सर्वेक्षणांना सुरुवात झाली. केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली, ‘मित्रा’ आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ही सर्वेक्षणे हाती घेण्यात आली आहेत. अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत ‘नियतकालिक श्रम शक्ती सर्वेक्षण’ (पीएसएफएस) आणि ‘असंघटीत क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण’ (एएसयुएसई) केले जाणार आहे. या सर्वेक्षणांसाठी प्रगणक मार्च २०२७ पर्यंत घरोघरी पोहोचणार आहेत. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी नागरिकांना या राष्ट्रीय कार्यात अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची आखणी करण्यासाठी ही सर्वेक्षणे अत्यंत मोलाची ठरणार आहेत. ‘नियतकालिक श्रम शक्ती सर्वेक्षण’ अंतर्गत निवडक कुटुंबांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे श्रम बाजाराचे महत्त्वाचे निर्देशांक तयार केले जातील. यामध्ये प्रामुख्याने श्रम शक्ती सहभाग दर, कामगार-लोकसंख्या गुणोत्तर आणि बेरोजगारी दर या घटकांची अचूक आकडेवारी संकलित केली जाईल, ज्यामुळे भविष्यातील रोजगार धोरणांना योग्य दिशा मिळेल. तर, ‘असंघटीत क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण’ अंतर्गत राज्यातील उत्पादन, व्यापार आणि इतर सेवा क्षेत्रातील असंघटीत व बिगर-कृषि आस्थापनांच्या आर्थिक आणि कार्यात्मक वैशिष्ट्यांची आकडेवारी गोळा केली जाणार आहे. यामुळे असंघटीत क्षेत्रातील उद्योगांच्या विकासासाठी योजना आखणे सोपे होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. या सर्वेक्षणांतर्गत नियुक्त कर्मचारी कुटुंब प्रमुख आणि उद्योग/आस्थापना प्रमुख यांच्या उपलब्धतेनुसार रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशीही भेटी देऊ शकतात. सर्वेक्षणादरम्यान नागरिकांकडून किंवा उद्योगांकडून मिळालेली वैयक्तिक व व्यावसायिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल आणि तिचा वापर केवळ सांख्यिकी उद्देशांसाठी व शासकीय योजनांच्या नियोजनासाठीच केला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या सर्वेक्षणांची माहिती गोळा करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाने आयपॉस रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची निवड केली आहे. या संस्थेमार्फत नियुक्त केलेले अन्वेषक आणि पर्यवेक्षक केवळ ‘नमुना पद्धतीने’ निवडलेल्या ग्रामीण भागातील गावांना आणि शहरातील विशिष्ट वॉर्डांमधील कुटुंबांना व आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित करतील. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, “या राष्ट्रीय महत्त्वाच्या सर्वेक्षणाचा दर्जा हा नागरिकांनी दिलेल्या अचूक माहितीवर आणि सहकार्यावर अवलंबून आहे. ज्या कुटुंबांना किंवा उद्योगांना या सर्वेक्षणांतर्गत अधिकारी-कर्मचारी भेट देतील, त्यांनी कोणतीही भीती न बाळगता योग्य व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे.”

Leave a Comment

error: Content is protected !!