दोन- तीन दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट:तालुक्यातील कपाशी उत्पादकांसमाेर प्रश्नचिन्ह‎

मारेगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. मृग नक्षत्राच्या आगमनानंतर पावसाच्या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी कपाशी व इतर पिकांची टोबणी केली. मात्र त्यानंतर तालुक्यात केवळ तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला असून, अनेक भागांत अद्याप समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज आकाश ढगाळ राहत असल्याने आज-उद्या पाऊस येईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. मात्र दररोज पाऊस हुलकावणी देत असल्याने पिकांची उगवण धोक्यात आली आहे. पेरणीनंतर जमिनीत आवश्यक ओलावा न मिळाल्याने बियाणे खराब होण्याची भीती निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत. मृग नक्षत्रावर अनेकांनी शेजारच्या शेतकऱ्यांनी टोबणी केल्याचे पाहून स्वतःही पेरणी करण्याचा निर्णय घेतला. पुढील काळात मजूर उपलब्ध होणार नाहीत, तसेच पाऊस वेळेत येईल, या अपेक्षेने घाईघाईने पेरणीचे काम उरकण्यात आले. मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने आता त्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणीची भीती सतावू लागली आहे.तालुक्यात सिंचनाची व्यवस्था अत्यंत मर्यादित असून बोटावर मोजण्याइतक्या क्षेत्रालाच पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे बहुतांश शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत पावसाने पाठ फिरवल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागू शकते. विशेष म्हणजे, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. भरपूर पाऊस होऊनही अपेक्षित उत्पादन मिळाले नव्हते. यंदा मात्र पावसाअभावी वेगळ्याच संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे वाढलेला शेती खर्च, महागडी बियाणे व खते आणि दुसरीकडे अनिश्चित पाऊस यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तालुक्यातील जवळपास ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली असल्याचे चित्र आहे. मात्र येत्या दोन दिवसांत चांगला पाऊस झाला नाही, तर अनेक ठिकाणी बियाण्यांची उगवण प्रभावित होऊन दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली असून सर्वांच्या नजरा आता आभाळाकडे खिळल्या आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!